मालेगाव, दि.०३ नोव्हेंबर : शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतीमधील विविध निविष्ठांसोबत शेतमजुरांची कार्यक्षमता हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. सध्याच्या पिक पध्दतीमध्ये शेतीची अनेक कामे ही कौशल्यावर आधारित आहेत. औषध फवारणी, फळबागांची छाटणी, बीबीएफद्वारे पेरणी, कापूस वेचणी ही कामे वेगवेगळ्या भागात वेगवेगळया पध्दतीने मजूर वर्गाला जर व्यवस्थित कौशल्य प्रशिक्षण दिले तर त्यांच्या कामांची गुणवत्ता, दर्जा व वेग सुधारण्यास निश्चित मदत होईल. यासाठी तालुक्यात आत्मा सन 2020-21 मध्ये 5 कौशल्य आधारीत प्रशिक्षण कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले असून यामधील प्रशिक्षित शेतमजुरांनी त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण करावी असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले.
तालुक्यातील तळवाडे येथील डाळिंब या पिकांसाठी छाटणी व विविध मशागतीची कामे करणाऱ्या 50 शेतमजूरांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कृषी आयुक्त धिरज कुमार, कृषी संचालक डॉ.नारायण शिसोदे, कृषी सहसंचालक संजीव पडवळ, विभागीय अधिक्षक कृषी अधिकारी सुनिल वानखेडे, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.
या प्रशिक्षण कार्यक्रमातंर्गत फळरोपवाटीका निळगव्हाण येथे कापूस व मका, डाळिंब पिकांवर फवारणी करणाऱ्या शेतमजूरांसाठी प्रशिक्षण माहे ऑगस्ट 2020 मध्ये संपन्न झाले. या प्रशिक्षणात 50 कौशल्य आधारित काम करणारे शेतमजूर उपस्थित होते. त्यांनतर चिंचावड येथे शेवगा पिकाची छाटणी व विविध मशागतीची कामे करणाऱ्या शेतमजुरांसाठी कौशल्य आधारीत प्रशिक्षण माहे ऑक्टोबर 2020 मध्ये संपन्न झाले. या प्रशिक्षण कार्यक्रमात 55 कौशल्य आधारीत कामे करणारे शेतमजूरांनी सहभाग नोंदविला होता. या सर्व प्रशिक्षीत शेतमजुरांनी त्यांच्या कौशल्यावर आधारित स्वतंत्र ओळख निर्माण करून समुह तयार करण्याचे आवाहनही मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी केले.
Copyright © 2024 lokshahiaghadi.com . 
Developed by Highclonoid softec.  
Powered By Siddhant Media.