मुंबई, दि. ०७ नोव्हेंबर : संकट प्रसंगी इतरांना मदत करण्याची भारताची थोर परंपरा आहे. कोरोना संसर्गाच्या काळात हा सेवाभाव प्रकर्षाने पहायला मिळाला. कोरोनाचे आव्हान अद्याप संपलेले नाही, त्यामुळे कोरोना योद्ध्यांनी यानंतर देखील दुप्पट उत्साहाने सेवाकार्य सुरु ठेवावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
भारत विकास परिषदेच्या कोकण प्रांतातर्फे राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते कोरोना वीरांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
सेवा करण्याची संधी ज्याला मिळाली त्यांनी निस्वार्थ भावनेने कार्य केले पाहिजे. भारत विकास परिषद संस्कार, सेवा व समर्पण भावनेने कार्य करीत असल्याचे गौरवोद्गार याप्रसंगी राज्यपालांनी काढले. राज्यपालांच्या हस्ते यावेळी बांधकाम व्यावसायिक निरंजन हिरानंदानी, नैनेश शाह, निर्मल लाईफस्टाईलचे धर्मेश जैन, ठाणे महानगरपालिकेच्या उपायुक्त वर्षा दिक्षीत, कोविड हॉस्पिटल पनवेलचे वैद्यकीय अधीक्षक नागनाथ येम्पल्ले यांचा सत्कार करण्यात आला.हिरानंदानी हॉस्पिटलचे डॉ. नीरज तुलारा, बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्स कोविड सेंटरचे डॉ.चेतन वेलानी, नर्सिंग अधीक्षक ज्योती खिमॉनंद पांडे, राज्यस्थानी सेवा संघाचे विश्वस्त विशाल टिब्रेवाला, सनदी लेखापाल सुनील पटोदिया, कोपरखैरणे लायन्स हॉस्पीटलचे अध्यक्ष सुरेन्द्र कुमार शर्मा, सनदी लेखापाल विनोद करंदीकर आदींचा देखील यावेळी राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
भारत विकास परिषदेच्या कोकण प्रांताचे पदाधिकारी गिरीश समुद्र, ओमप्रकाश पांडे, डॉ. जिलेसिंह, श्रीमती चेतना कोरगावकर, धीरज सोनार, भवानी सिंह राठौड, रत्नेश चंद्र जैन, साधना जोशी, सुरेंद्र उसगावकर, जयंत फाळके, मीरा मिश्रा यांचा देखील यावेळी राज्यपालांनी सत्कार केला. भारत विकास परिषदेच्या कोकण प्रांताचे अध्यक्ष शरद मडीवाले, वित्त सचिव भीमजी रूपानी, सचिव लक्ष्मीनिवास जाजू व महासचिव महेश शर्मा यावेळी उपस्थित होते.
Copyright © 2024 lokshahiaghadi.com . 
Developed by Highclonoid softec.  
Powered By Siddhant Media.