अहमदनगर, दि. २४ डिसेंबर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतक-यांच्या प्रश्नावर आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी आज त्यांची राळेगणसिद्धीमध्ये भेट घेतली. आंदोलन करू नये, अशी विनंती अण्णांना केली आहे, अशी माहिती महाजन यांनी या वेळी दिली.
कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत शेतकर्यांचे आंदोलन सुरू आहे. त्याचदरम्यान शेतकरी प्रश्नांवर आंदोलन करण्याचा इशारा हजारे यांनी दिला होता. त्या पार्श्वभूमीवर आज महाजन हे राळेगणसिद्धीमध्ये आले होते. त्यांनी आंदोलनासंबंधी अण्णांसोबत चर्चा केली. आंदोलन न करण्याची विनंती आपण अण्णांना केली आहे. गरज पडली तर, देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून त्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न करू, असे महाजन यांनी या वेळी सांगितले. विशेष म्हणजे, मागील आंदोलनावेळी महाजन यांनीच मध्यस्थीची भूमिका बजावली होती. हजारे यांनी मोदी, फडणवीस आणि कृषी मंत्र्यांवर आश्वासन न पाळल्याचा आरोप केला आहे.
अण्णांनी काही दिवसांपूर्वी शेतकरी प्रश्नावर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता; मात्र कृषी कायद्यांविरोधात सध्या दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाबाबत आणि कायदे मागे घेण्याबाबत त्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. केवळ कृषी कायदे मागे घेऊन शेतकर्यांचे प्रश्न सुटतीलच असे नसून, दिल्लीतील आंदोलन हे सीमित आहे, असे मत त्यांनी नुकतेच व्यक्त केले होते. यापूर्वी हरिभाऊ बागडे, प्रा. भानुदास बेरड यांनी अण्णांची भेट घेऊन त्यांचे मतपरिर्वन करण्याचा प्रयत्न केला; परंतु अण्णांनी आंदोलनावर ठाम राहण्याची भूमिका घेतली आहे.
Copyright © 2024 lokshahiaghadi.com . 
Developed by Highclonoid softec.  
Powered By Siddhant Media.