नवी दिल्ली, दि. ३ फेब्रुवारी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सोडून या देशात सर्वजण दहशतवादी आहेत?, तुम्ही देशाच्या पाठीचा कणा असणार्या शेतक-यांचीच ही दुरवस्था करत आहात, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सत्ताधारी मोदी सरकारवर निशाणा साधला. सोबतच दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी यंदाच्या वर्षी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पावर सडकून टीका केली.
’सरकार किल्लाबंदी का करत आहे? सरकार शेतक-यांना घाबरते का? शेतकरी देशाची ताकद आहेत. त्यांना दाबणेे, मारणे आणि धमकावणे सरकारचे काम नाही. सरकारने शेतकर्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे काम करावे. शेतक-यांनी दिल्लीला वेढा दिला आहे. शेतक-यांनी आंदोलन करणे हे देशासाठी योग्य नाही’, अशा शब्दांत त्यांनी शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर असणा-या केंद्राच्या भूमिकेची निंदा केली. जनतेने तुम्हाला निवडून दिले आहे. तुमचे काम आहे, त्यांच्या हिताचा विचार करणे. या एक टक्के लोकसंख्येसाठी तुम्ही देश विकू शकत नाही, अशा शब्दांत राहुल यांनी पावलोपावली मोदी सरकारला निशाण्यावर घेतले. ’मी शेतक-यांना चांगले ओळखतो ते कुठेही जाणार नाहीत. अखेर एक दिवस सरकारलाच मागे हटावे लागेल. त्यापेक्षा आताच माघार घ्या’, अशा इशारा त्यांनी दिला.
शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यांवर टाळाटाळ करण्याची गरज नसून पारदर्शी आणि स्पष्ट भूमिका घेण्याची वेळ आता आली आहे, असे म्हणत शेतक-यांप्रती सरकारच्या निर्णयांवर त्यांनी निशाणा साधला. मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच या आंदोलनाबात त्यांचे मौन सोडत प्रतिक्रिया दिली होती. यावरही त्यांनी टीका केली.
Copyright © 2024 lokshahiaghadi.com . 
Developed by Highclonoid softec.  
Powered By Siddhant Media.