मुंबई, दि. २३ डिसेंबर : राज्यातील शेतकरी उत्पादक कंपनी आणि शेतकरी उत्पादक गटांचा भाजीपाला, फळे थेट ग्राहकांपर्यत पोहचविण्याकरिता ‘नोगा’ ब्रँडखाली मूल्यसाखळी विकसित करण्यावर भर द्यावा. शहरी भागातील रहदारीच्या ठिकाणी व महामंडळाची मालकी असलेल्या जागेवर ‘नोगा’ उत्पादनांची विक्री स्थळे उभारावीत, असे निर्देश कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिले.
मंत्रालयात झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य कृषि उद्योग महामंडळाच्या कामांचा आढावा कृषिमंत्री श्री. भुसे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. कृषी उद्योग महामंडळाने ‘विकेल ते पिकेल’ या उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन लोकाभिमुख व्हावे, असे आवाहन श्री.भुसे यांनी केले आहे.
यावेळी महामंडळाच्या तांत्रिक व लेखाविषयक बाबींचा आढावा घेतानाच पारंपरिक रासायनिक खते, कीटकनाशके व कृषि अवजारांसोबतच नाविन्यपूर्ण उत्पादने, ट्रायकोडर्मा, फेरोमन सापळे यांचे उत्पादन करून महामंडळाचे उत्पन्न वाढविण्यावर भर द्यावा, अशी सूचना श्री. भुसे यांनी केली. यावेळी महामंडळाची मालकी असलेल्या राज्यभरातील स्थावर जंगम मालमत्तेबाबतही सविस्तर आढावा घेतला.
Copyright © 2024 lokshahiaghadi.com . 
Developed by Highclonoid softec.  
Powered By Siddhant Media.