नवी दिल्ली, , दि. १ एप्रिल : जागतिक व्यापाराची कोंडी करणाऱ्या सुएझ कालवा ब्लॉकप्रकरणी अडकलेल्या जहाजातील भारतीय कर्मचारी अडचणीत आले आहेत. सुएझ कालव्यातील जागतिक सागरी मार्गच बंद झाल्याने युरोप आणि आशियातील व्यवहार ठप्प झाले. त्यामुळे अब्जावधींचे नुकसान झाले. त्यामुळे जहाज कंपनीला दंड ठोठावण्यात आला. आता इजिप्त सरकार आणि कालवा प्रशासनाकडून या प्रकरणाची कसून चौकशी होत आहे. या जहाजाच्या चालक पथकात 25 सदस्य भारतीय होते. त्यामुळे या प्रकरणात त्यांनाच बळीचा बकरा बनवले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तपासानंतर या भारतीय कर्मचाऱ्यांना अटकही होण्याची शक्यता आहे.
या जहाजाने तब्बल एक आठवडाभर सुएझ कालव्यातील सागरी मार्ग ब्लॉक केला होता. अखेर अनेक प्रयत्नांनंतर जहाज काढण्यात यश आले. त्यामुळे हा मार्ग सुरू झाला; मात्र इजिप्तचे तपास पथक या घटनाक्रमाचा खोलवर तपास करत आहे. सुएझ कालवा प्रशासनदेखील या प्रकरणात तपास चौकशी करत आहे. या प्रकरणी जहाजावरील भारतीय कर्मचाऱ्यांना नजरकैदेत ठेवले जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. यानंतर त्यांना अटकही होण्याची शक्यता आहे.
मागील आठवड्यात सुएझ कालव्यात अडकलेल्या महाकाय जहाजाच्या अपघातात त्या वेळी सुरु असलेले वेगवान वारे आणि खराब वातावरणाची भूमिका असल्याचे सांगण्यात आले होते; मात्र इजिप्त सरकारला तपासात संबंधित अपघात हवेचा वेग किंवा खराब वातावरणामुळे झाला नसल्याचे समजले आहे. हा अपघात मानवी आणि तांत्रिक चुकीमुळे झाल्याचे समोर आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या जहाजावरील भारतीय चालकांच्या पथकाला आपल्या पदावरुन हटवले जाण्याची शक्यता आहे. तसेच यामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीमुळे या कर्मचाऱ्यांवर गुन्हेगारी स्वरुपाचा खटला चालून तुरुंगवास होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. भारत सरकार आणि भारतीय समुद्री चालक यूनियन याबाबत चिंतीत आहे.
Copyright © 2024 lokshahiaghadi.com . 
Developed by Highclonoid softec.  
Powered By Siddhant Media.