All News

निवडणुकीनंतरच्या विजयी मिरवणुकीला निवडणूक आयोगाची बंदी

निवडणुकीनंतरच्या विजयी मिरवणुकीला  निवडणूक आयोगाची बंदी

नवी दिल्ली, दि.२७ एप्रिल : देशात एकीकडे कोरोनाचा कहर सुरू असताना दुसरीकडे पाच राज्यांमधील निवडणूकदेखील चर्चेचा विषय ठरत आहे. रुग्णसंख्या वाढत असतानाही या राज्यांमध्ये सुरु असलेल्या प्रचारसभा आणि गर्दी यामुळे नाराजी व्क्त होत होती. मद्रास उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला कोरोनाच्या दुसर्‍या लाटेसाठी तुम्हीच जबाबदार आहात, अशा शब्दांत फटकारले आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने महत्वाचा निर्णय घेतला असून दोन मे रोजी निकालाच्या दिवशी आणि नंतरही विजयी मिरवणुकांवर बंदी आणली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना कोणत्याही प्रकारे विजयी जल्लोष करता येणार नाही.


मद्रास उच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर निवडणूक आयोगाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. मद्रास उच्च न्यायालयाने मतमोजणीच्या दिवशी कोरोनाच्या नियमांचे पालन कशा पद्धतीने केले जाईल, यासंबंधी ब्ल्यू प्रिंट सादर करण्यास निवडणूक आयोगाला सांगितले होते. पाचही राज्यांमध्ये प्रचारसभांदरम्यान कोरोनाच्या नियमांचे जाहीरपणे उल्लंघन होत असतानाही राजकीय पक्षांना न रोखल्याने मद्रास उच्च न्यायालयाने नाराजी जाहीर केली होती. कोरोना फैलावास केवळ आयोगच जबाबदार असून, आयोगाच्या अधिकार्‍यांवर हत्येचा गुन्हा दाखल करायला हवा, अशा शब्दांत न्यायालयाने आयोगाला फटकारले होते. येत्या दोन मे रोजी होणार्‍या मतमोजणीदरम्यान कोरोना नियमांच्या पालनाचे निर्देश देण्याच्या मागणीसाठी तमिळनाडूचे परिवहनमंत्री आणि अण्णाद्रमुकचे उमेदवार एम. आर. विजयभास्कर यांनी केलेल्या जनहित याचिकेवर मुख्य न्यायाधीश संजीब बॅनर्जी आणि न्या. एस. राममूर्ती यांच्या खंडपीठाने सोमवारी सुनावणी घेतली.


कोरोना नियमांचे पालन करून मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात येत आहेत, असे निवडणूक आयोगाच्या वकिलांनी न्यायालयात सांगताच न्यायालयाने आयोगाची कानउघाडणी केली. राजकीय पक्षांना मोठ्या प्रचारसभा आयोजित करण्याची परवानगी देऊन निवडणूक आयोगाने कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला मार्ग मोकळा करून दिला. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला आयोगालाच जबाबदार धरले पाहिजे, असे न्या. बॅनर्जी यांनी नमूद केले. निवडणूक आयोग ही सर्वाधिक बेजबाबदार संस्था आहे, अशी टिप्पणी करत न्यायालयाने दोन मे रोजीची मतमोजणी थांबवण्यासही मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा आयोगाला दिला होता.

Advertisement

IBPS MahaExam test2 IBPS