All News

निवडणुकीचा बिगुल वाजला

निवडणुकीचा बिगुल वाजला

  • बंगालमध्ये आठ, आसाममध्ये तीन, तर इतरत्र एकाच टप्प्यात मतदान

नवी दिल्ली, दि. २७ फेब्रुवारी : निवडणूक आयोगाने अखेर पश्चिम बंगाल, केरळ, तमीळनाडू, आसाम या चार राज्यांसह पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये मार्चमध्ये मतदान होणार आहे, तर केरळ, आसाम, आणि पुद्दुचेरीत सहा एप्रिल रोजी मतदान होणार आहे. आसाममध्ये तीन, तर पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यांत मतदान होणार आहे. केरळ, पुद्दुचेरी आणि तमीळनाडूत प्रत्येकी एका टप्प्यात मतदान होणार असून या पाचही राज्यात दोन मे रोजी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे, अशी घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी केली. 


बिहार विधानसभा निवडणुकीनंतर पाच राज्यातील निवडणुका या अत्यंत आव्हानात्मक आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका होत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या काळात आपल्याला नव्या गोष्टींचा अवलंब करावा लागणार आहे. या निवडणुकीत निवडणूक अधिकारी-कर्मचारीही कोरोना योद्धयासारखे काम करणार आहेत, असे त्यांनी सांगितले. आसाममध्ये तीन टप्प्यात निवडणुका


होतील. पहिल्या टप्प्यात 27 मार्च रोजी मतदान होणार आहे. दुस-या टप्प्याचे मतदान एक एप्रिल रोजी होणार आहे. तिस-या टप्प्याचे मतदान सहा एप्रिल रोजी होणार आहे. केरळ, तमीळनाडू, पुद्देचेरीत एका टप्प्यात सहा एप्रिल रोजी मतदान होणार आहे.


पश्चिम बंगालमध्ये एकूण आठ टप्प्यांत मतदान होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात 27 मार्च रोजी, दुसर्या टप्प्यात एक एप्रिल रोजी, तिसर्या टप्प्यात सहा एप्रिल रोजी, चौथ्या टप्प्यात दहा एप्रिल रोजी, पाचव्या टप्प्यात 17 एप्रिल रोजी, सहाव्या टप्प्यात 22 एप्रिल रोजी, सातव्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी आणि आठव्या टप्प्यात 28 एप्रिल रोजी मतदान होणार असून दोन मे रोजी निकाल लागणार आहेत.  पश्चिम बंगालमध्ये एक लाखाहून अधिक मतदान केंद्रे असून 18.6 कोटी मतदार मतदान करणार आहेत. पाचही राज्यात एकूण 2.7 लाख मतदान केंद्रांवर मतदान होईल. आसाममध्ये तीन हजार मतदान केंद्र असतील. तसेच सर्व मतदान केंद्रे ग्राऊंड फ्लोअरवर असतील असे अरोरा यांनी जाहीर केले. सर्व मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


मतदानाच्या वेळेत एका तासाने वाढ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात आल्याने मतदानाची वेळ एका तासाने वाढवण्यात आली आहे. नामांकन अर्ज ऑनलाईन भरण्याची सुविधा देण्यात येणार असून ऑनलाईनवरच निवडणुकीची अनामत रक्कम भरता येणार असल्याचे अरोरा यांनी सांगितले.


सीआरपीएफचा वॉच

पाचही राज्यांतील विधानसभा निवडणुकीदरम्यान मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पाचही राज्यात केंद्रीय राखीव दलाचे जवान तैनात करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच राज्य राखीव दलाचे जवानही निवडणूक काळात तैनात असतील. उत्सव आणि परीक्षेच्या दिवशी निवडणूक होणार नाही. या पाचही राज्यांच्या निवडणुकीत उमेदवारांना किंवा त्यांच्या समर्थकांना घरोघरी प्रचार करण्यासाठी मोठा ताफा घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. प्रत्येक उमदेवाराला केवळ पाच लोकांना घेऊनच घरोघरी प्रचार करता येणार आहे.

Advertisement

Highclonoid Softec Pvt Ltd IBPS IBPS test2