All News

अभियांत्रिकी प्रवेशाचे धोरण धोकादायक

अभियांत्रिकी प्रवेशाचे धोरण धोकादायक

  • शास्त्रज्ञ व्ही. के. सारस्वत यांची एआयसीटीईवर टीका

मुंबई, दि. २० मार्च :  इंजिनीअरिंगसाठी प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे (एआयसीटीई)ने काही दिवसांपूर्वीच नवे धोरण जाहीर केले. यानुसार बारावीच्या विद्यार्थ्याने गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र हे तीन विषय घेतले नसतील, तरीही त्याला इंजिनीअरिंगसाठी प्रवेश घेता येणार आहे; पण या निर्णयावरुन नीती आयोगाचे सदस्य आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ व्ही. के. सारस्वत यांनी टीका केली आहे. सारस्वत हे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) माजी प्रमुख होते. 


अभियांत्रिकी शाखेच्या प्रवेशासाठी बारावीला गणित आणि भौतिकशास्त्र विषय बंधनकारक न ठेवण्याचा अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचा निर्णय धोकादायक आहे, असे सारस्वत म्हणाले. तसेच, यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला. गणित आणि भौतिकशास्त्र हे दोन विषय कोणत्याही अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, असे त्यांनी नमूद केले. जैवऔषधी अभियांत्रिकी आणि जैवतंत्रज्ञानसारख्या अभियांत्रिकी शाखांनाही गणित आणि भौतिकशास्त्र यांचे ज्ञान आवश्यक आहे. अभियांत्रिकी क्षेत्रात प्रवेश करणार्‍यांसाठी गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र विषय बंधनकारक नसणे हे धोकादायक ठरू शकते, कारण यामुळे विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीचे मूलभूत शिक्षणच मिळणार नाही, असे सारस्वत यांनी म्हटले आहे. 


गेल्या आठवड्यात, एआयसीटीईने पदव्युत्तर अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश पात्रता निकषांमध्ये बदल केला. गणित, भौतिकशास्त्र हे विषय अकरावी, बारावीच्या स्तरावर अभ्यासण्याचे बंधन शिथील करून तीन विज्ञान विषय घेऊन बारावीची परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांनाही अभियांत्रिकी प्रवेशाची मुभा दिली. या निर्णयावर झालेल्या टीकेनंतर परिषदेने पात्रता निकष निश्‍चित करण्याची जबाबदारी राज्यांवर किंवा विद्यापीठांवर सोपवली; मात्र नियम पूर्णपणे मागे घेतला नाही. त्यामुळे राज्यांनी स्वीवकारल्यास बारावीला गणित आणि भौतिकशास्त्र न घेणार्‍या विद्यार्थ्यांंना अभियांत्रिकीला प्रवेश मिळू शकतो. एआयसीटीई या संस्थेने आता 14 विषयांची यादी जाहीर केली असून इंजिनीअरिंगमध्ये प्रवेशासाठी यादीतील 14 पैकी कोणत्याही तीन विषयांमध्ये विद्यार्थ्यांनी किमान 45 टक्के मार्कांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. यात गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, संगणकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती व तंत्रज्ञान, जीवशास्त्र, इन्फॉर्मेशन प्रॅक्टिस, जैवतंत्रज्ञान, टेक्निकल व्होकेशनल सब्जेक्ट, इंजिनीअरिंग ग्राफिक्स, बिझनेस स्टडीज आणि उद्योजकता या विषयांचा समावेश असेल.

Advertisement

test 4 IBPS IBPS MahaExam