नवी दिल्ली, दि. २६ जानेवारी : दिल्लीच्या अक्षरधाम मंदिराजवळचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अक्षरधामच्या आधी पोलिसांनी बॅरिकेड लावले होते. मात्र, काही शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या मदतीने बॅरिकेड तोडून दिल्लीकडे घुसण्याचा प्रयत्न केला. यामुळे पोलिसांनी अश्रूधूराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीचार्ज करत या शेतकऱ्यांना माघारी जाण्यास भाग पाडले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावरील सुरू असलेले संचलन पार पडल्यानंतर शेतकऱ्यांच्या या ट्रॅक्टर मोर्चाला परवानगी देण्यात आलेली आहे. दरम्यान, यासाठी दिल्ली पोलिसांनी आखून दिलेल्या मार्गाने जाण्यास शेतकऱ्यांनी नकार दिला आहे. 'दिल्ली पोलिसांनी सांगितलेला मार्ग आम्हाला मान्य नाही. आम्ही दिल्लीतच जायचे आहे', अशी कठोर भूमिका आता शेतकऱ्यांनी घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर, सध्या शेतकरी आणि पोलिसांमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. दिल्ली-हरियाणाच्या तिकरी बॉर्डरवर शेतकऱ्यांची पोलिसांनी सुरक्षेसाठी उभारलेले बॅरिकेड्स तोडले आहेत.
तब्बल ५० दिवसांहूनही अधिक काळ आपल्या मागण्यांसाठी हे शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. केंद्र सरकरसोबत जवळपास १२ ते १३ बैठका झाल्या आहेत. तरीही कोणताही मार्ग निघत नसल्याने इतके दिवस शांततापूर्ण आंदोलन करणारे शेतकरी आज आक्रमक पवित्र्यात दिसत आहेत. दिल्लीकडे कूच करणाऱ्या या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला रोखणे पोलिसांसाठी देखील मोठे आव्हान असून याच पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सीमांवर तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे.
Copyright © 2024 lokshahiaghadi.com . 
Developed by Highclonoid softec.  
Powered By Siddhant Media.