मुंबई, दि. २१ जानेवारी : राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. यंदाच्या वर्षी 12वीची परीक्षा 23 एप्रिलपासून सुरू होईल, तर 21 मे रोजी शेवटचा पेपर असेल. दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 29 मे या कालावधीमध्ये घेतली जाईल. दहावीच्या परिक्षेचा निकाल ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस आणि 12वी च्या परीक्षांचा निकाल जुलै महिन्याच्या अखेरीस लागणार आहे.
मागच्यावर्षी कोरोनामुळे शाळा आणि कॉलेज सुरू झाली नव्हती. त्यामुळे यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा उशीरा सुरू होणार आहेत. मार्च महिन्यापासूनच राज्यात कोरोनाने डोके वर काढल्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांचा भूगोलाचा पेपर झाला नव्हता, अखेर राज्य सरकारने हा पेपर रद्द करत विद्यार्थ्यांना सरासरी मार्क देण्याची घोषणा केली होती. दरम्यान, कोरोनामुळे बंद असलेल्या पाचवी ते आठवीच्या शाळा जानेवारी महिन्याच्या अखेर सुरू करणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली; पण चौथी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकारने अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. कोरोनाची लागण झालेल्या किंवा क्वारंटाईनमध्ये असणा-या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेतली जाणार आहे, अशी माहिती गायकवाड यांनी दिली.
Copyright © 2024 lokshahiaghadi.com . 
Developed by Highclonoid softec.  
Powered By Siddhant Media.