नवीदिल्ली, दि. २५ डिसेंबर : ममता बॅनर्जी यांच्या राजकीय विचारधारेमुळे पश्चिम बंगालचे किती नुकसान झाले आहे. जर तुमच्या हृदयात शेतक-यांसाठी एवढे प्रेम होते, तर मग बंगालमध्ये शेतकर्यांना न्याय देण्यासाठी, शेतकरी सन्मान निधी योजनेचे पैसे शेतक-यांना मिळावे यासाठी का आंदोलन केले नाही? का कधीच आवाज उठवला नाही? आणि आता तिथून उठून पंजाबला पोहचलात. आपल्या शेतक-यांना न्याय देण्यासाठी त्यांना राजकारण आडवे येते व आता दिल्लीत आंदोलनासाठी जात आहेत, अशा कठोर शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॅनर्जी यांच्यावर टीकेचे आसूड ओढले.
केंद्र सरकारने तीन नवे कृषी कायदे रद्द करावे, या मागणीसाठी मागच्या काही दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतक-यांचे आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मोदी यांनी आज देशभरातील शेतकर्यांशी संवाद साधला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी देशातील शेतकर्यांकडून अनुभव जाणून घेतले. या वेळी शेतकरी सन्मान निधी योजनेमुळे देशभरातील शेतक-यांना मिळालेल्या लाभाच्या मुद्यावर बोलत असताना, त्यांनी ममता बॅनर्जींसह डाव्या पक्षांवर निशाणा साधला.
ते म्हणाले, की पश्चिम बंगालमधील 70 लाखांपेक्षा जास्त शेतकरी बांधव शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत, ते हे पैसे घेऊ शकत नाहीत. कारण, बंगाल सरकारच्या राजकीय कारणांमुळे त्यांच्या राज्यांमधील शेतक-यांना ते पैसे मिळत नाहीत. जेव्हापासून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सुरू झाली, तेव्हापासून एक लाख दहा कोटींपेक्षा जास्त शेतक-यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. 18 हजार कोटींपेक्षा जास्तरुपये काही क्षणात थेट शेतक-यांच्या बँक खात्यात जमा झाले; परंतु मला आज या गोष्टीचे वाईटदेखील वाटत आहे, की संपूर्ण देशातील शेतक-यांना या योजनेचा लाभ मिळत आहे. सर्व विचारधारांची सरकारे याच्याशी जोडलेली आहेत; मात्र एकमेव पश्चिम बंगालमधील 70 लाखांपेक्षा जास्त शेतकरी बांधव, या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.
स्वार्थाच्या राजकारणाचे एक उदाहरण सर्वांनाच दिसत आहे. जे पक्ष पश्चिम बंगालमधील शेतक-यांच्या हिताबद्दल काहीच बोलत नाही. ते येथे दिल्लीतील नागरिकांना त्रास देण्याच प्रयत्न करत आहेत, देशाचे अर्थकारण बिघडवण्यासाचा प्रयत्न करत आहेत आणि ते देखील शेतक-यांच्या नावावर. मी त्यांना म्हणतो, की येथे फोटो काढण्यापेक्षा केरळमध्ये आंदोलन करून तिथे बाजार समित्या सुरू करा. पंजाबच्या शेतक-यांना भरकटवण्यासाठी तुमच्याकडे वेळ आहे. केरळमध्ये ही व्यवस्था नाही, जर ही व्यवस्था चांगली आहे, तर मग केरळमध्ये का नाही. हा दुटप्पीपणा का? हे कशाप्रकारचे राजकारण करत आहात? ज्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. अशा शब्दांत मोदी यांनी डाव्यांवरही टीका केली.
नऊ कोटी शेतक-यांच्या खात्यावर 18 हजार कोटी
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी सन्मान निधी योजनेतंर्गत देशातील नऊ कोटी शेतक-यांच्या खात्यात 18 हजार कोटी रुपये जमा केले. त्यानंतर सरकारच्या विविध योजनांचा शेतक-यांना कसा लाभ होतो, हे त्यांच्याकडून जाणून घेतले.
शेतकरी आंदोलनाचा जिओला फटका
पंजाब आणि हरियाणातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतून रिलायन्स जिओच्या टावरचे वीज कनेक्शन तोडले जात आहे. हरियाणातील सिरसासह इतर काही जिल्ह्यांतील नागरिक जिओ टावरचे वीज कनेक्शन तोडून आपला विरोध दर्शवत आहेत. शेतकरी आंदोलनामुळे रिलायन्स जिओचे आव्हान वाढले आहे. काही दिवसांपूर्वी रिलायन्स जिओने आपल्या प्रतिस्पर्धक कंपन्या भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया लि. वर शेतक-यांची दिशाभूल करत असल्याचा आरोपही केला होता. दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांनी मोबाईल टॉवरची वीज तोडू नका, असे आवाहन केले आहे.
Copyright © 2024 lokshahiaghadi.com . 
Developed by Highclonoid softec.  
Powered By Siddhant Media.