मुंबई, दि. ०८ ऑक्टोबर : मुंबई पोलिसांनी टेलिव्हिजन चॅनेल्सच्या टीआरपीमध्ये फेरफार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. बीएआरसी आणि हंसा या कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांकडून हे रॅकेट चालवण्यात येत होते. या माध्यमातून फक्त मराठी, बॉक्स सिनेमा आणि रिपब्लिक टीव्ही या वाहिन्यांना अवैधरित्या वाढीव टीआरपीचा लाभ मिळाला होता, अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिली. दरम्यान रिपब्लिक टीव्हीची बदनामी झाली असून मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर मानहानीचा दावा ठोकणार असल्याचे अर्णब गोस्वामी यांनी सांगितले
या रॅकेटतंर्गत प्रत्येक घरामध्ये दर महिन्याला ४०० ते ५०० रुपये दिले जायचे असे पोलिसांनी सांगितले. अनेक कुटुंबांनी त्यांना पैसे मिळाल्याचे मान्य केले असे पोलिसांनी सांगितले. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या टीआरपी रॅकेटचा घोटाळा उघड केला. या प्रकरणात पोलिसांनी दोन मराठी वाहिन्यांच्या मालकांना अटक केली आहे. रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी वाढवण्यासाठी काही लोकांना पैसे देऊन आपल्या घरात दिवसभर हे चॅनेल सुरु ठेवण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे चॅनेलच्या टीआरपीत मोठी वाढ दिसून आली होती. याचा थेट फायदा जाहिराती मिळवण्यासाठी होत असे. त्यामुळे आता या टीआरपीच्या आधारे संबंधित चॅनेल्सला मिळालेल्या जाहिरातींचीही चौकशी केली जाईल. तसेच हे जाहिरातदारही या रॅकेटमध्ये सहभागी होते का, याचा तपास केला जाईल” अशी माहिती परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Copyright © 2024 lokshahiaghadi.com . 
Developed by Highclonoid softec.  
Powered By Siddhant Media.