पुणे, दि. २५ डिसेंबर : मोदी सरकार नेहमीच शेतकर्यांच्या पाठीशी उभे राहिले आहे आणि नेहमीच राहील. शेतक-यांना संरक्षण देण्याचे काम त्यांचे तीन कृषी कायदे करणार आहेत. शेतक-याला त्याच्या मालाचा योग्य मोबदला देण्यासाठी मोदी यांनी कृषी कायदे आणले; मात्र विरोधक या कायद्यांबद्दल खोटा प्रचार करून शेतक-यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करत आहेत, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
पुण्यातील के. के. घुले विद्यालयाच्या मैदानात फडणवीस यांची सभा झाली. या वेळी मोदी सरकारच्या शेतकरी योजनांचा पाढा वाचत फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र डागले. ते म्हणाले, की सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांचा विरोधकांनी अभ्यास करावा. कंत्राटी शेती करताना काही वाद झाले तर शेतक-यांना न्यायालयात जाता येणार आहे, हे या कायद्यात आहे. तसेच किमान हमी भाव रद्द होणार नाही, बाजार समिती बरखास्त केल्या जाणार नाहीत, हे या कायद्यात असूनही विरोधक शेतक-यांना खोटे सांगून भडकवण्याचे काम करत आहेत.
शेतक-यांवर अस्मानी संकट असो वा सुल्तानी; मोदी सरकार कायम शेतक-यांना मदत करण्यासाठी पुढे सरसावते आहे. आमचे सरकार असतानाही आम्ही कायम शेतकरी हिताची भूमिका घेतली; मात्र ठाकरे सरकारला शेतक-यांचे काहीही देणेघेणे नाही. शेतक-यांच्या बांधावर जाऊन मोठ्या उत्साहात त्यांना मदतीची घोषणा केली; मात्र प्रत्यक्षात सरकारने मदत दिली नाही. कुठे गेला सरकारचा वादा, असा सवाल करत त्यांनी राज्य सरकारला झोपडून काढले. राज्य सरकरने पीकविमा योजना बासनात गुंडाळून ठेवली. केळी उत्पादक शेतक-यांसाठी असणा-या विम्याचे या सरकारने नियम बदलल्यामुळे मदत मिळत नाही. हे सरकार शेतक-यांचा विचार करत नाही. ठाकरे शेतक-यांच्या बांधावर गेले होते, तेव्हा 25 हजार रुपये हेक्टरी द्या, अशी मागणी केली होती; परंतु पैसे देण्याची वेळ आली तेव्हा आठ हजार रुपये दिले, ही दुट्टपीपणाची भूमिका आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.
या वेळी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, की देशात कृषी कायद्याबद्दल गैरसमज पसरवले जात आहेत. कृषी विधेयकाविरोधात आंदोलने केली जात आहेत. विरोधकांना या मुद्द्याचे फक्त राजकारण करायचे आणि त्यांना फक्त जाणूनबुजून विरोध करायचा आहे; पण शेतकरी विरोधकांची चाल ओळखून आहेत.
Copyright © 2024 lokshahiaghadi.com . 
Developed by Highclonoid softec.  
Powered By Siddhant Media.