नवी दिल्ली, दि. २७ डिसेंबर : भारतात तयार होणा-या वस्तू जागतिक दर्जाच्या असाव्यात, अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्यासाठी उद्योगपतींना पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले. देशवासीयांना नव्या वर्षानिमित्त संकल्प करण्याचे आवाहन मोदी यांनी केले.
मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला. देशभरातील नागरिकांनी पाठवलेल्या पत्रांचा उल्लेख करत त्यांनी जनता संचारबंदी, कोरोना, आत्मनिर्भर भारत, व्होकल फॉर लोकल यासह विविध मुद्द्यांवर भाष्य केले. वर्षाच्या शेवटच्या मन की बात कार्यक्रमात मोदी म्हणाले, की मला अनेक नागरिकांनी पत्र पाठवली आहेत. यात अनेकांनी देशाचं सामर्थ्य, देशाच्या एकजुटीचे कौतुक केले आहे. जनता संचारबंदीसारखा अभिनव प्रयोग पूर्ण जगाला प्रेरणा देणारा ठरला. टाळ्या आणि थाळ्या वाजवून देशाने कोरोना योद्ध्यांचा सन्मान केला. एकजूट दाखवली. हेसुद्धा अनेकांनी लक्षात ठेवले.
मोदी म्हणाले, की व्होकल फॉर लोकलची भावना देशातील नागरिकांनी दृढ करण्याची गरज आहे. हे आपल्याला वाढवत राहायचे आहे. प्रत्येकजण नव्या वर्षात काही संकल्प करतो. या वेळी देशासाठी हा एक संकल्प आवश्यक करावा. मी आधीही बोललो आहे. मी पुन्हा एकदा आग्रह करतो, की आपण एक यादी बनवावी. दिवसभर आपण ज्या गोष्टी घेतो. त्यामध्ये नकळतपणे विदेशात तयार होणा-या वस्तू तर घेत नाही ना? त्या वस्तूंना भारतात तयार झालेल्या पर्यायी वस्तूची माहिती घ्या. ती वस्तू भारतात तयार होईल, यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन मोदी यांनी केले. देशाच्या सन्मानार्थ सामान्य माणसांमध्ये झालेले बदल आपण अनुभवले आहेत. मी देशात आशेचा एक अद्भुत प्रवाहही बघितला आहे. असंख्य आव्हाने होती, संकटे पण आली. कोरोनामुळे जगभरात पुरवठा साखळीत अनेक समस्या आल्या; पण भारताने प्रत्येक संकटात नवीन गोष्टी आत्मसात केल्या, असे ते म्हणाले.
Copyright © 2024 lokshahiaghadi.com . 
Developed by Highclonoid softec.  
Powered By Siddhant Media.