इस्लामाबाद, दि. १० मे : ऑगस्ट 2019मध्ये भारताच्या संसदेने पाकिस्तानला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. तेव्हापासूनच पाकिस्तानकडून या निर्णयावरून आक्रमक भूमिका घेतली गेली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेश यांनी कलम 370 रद्द करण्याच्या भारत सरकारच्या निर्णयावर कायमच आगपाखड केली; परंतु आता प्रथमच कलम 370 ही भारताची अंतर्गत बाब असल्याचे पाकिस्तानने मान्य केले आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ही भूमिका मांडली आहे; मात्र, असे सांगताना त्यांनी कलम 35अ आमच्यासाठी महत्त्वाचे असल्याचे नमूद केले आहे.
भारतीय संसदेने कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. विरोधकांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरोधात तीव्र शब्दांत टीका केली होती. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे हे कलम रद्द केल्यानंतर भारत सरकारने जम्मू-काश्मीरची विभागणी लडाख आणि काश्मीर अशा दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये केली. त्यावरून पाकिस्तानने भारत सरकारवर टीका करत तीव्र नापसंती दर्शवली होती. तसेच, काश्मीरच्या मुद्द्यांवर भारत सरकार योग्य भूमिका घेत नाही, तोपर्यंत भारतासोबत कोणतेही व्यापारी संबंध ठेवले जाणार नाहीत, अशी भूमिका नुकतीच शाह महमूद कुरेशी यांनी घेतली होती; मात्र आता आपल्या या भूमिकेवरून पाकिस्तानने घुमजाव केले आहे.
शाह महमूद कुरेशी यांनी या मुलाखतीमध्ये कलम 370 आणि कलम 35 अ या दोन्ही कलमांविषयी पाकिस्तानची भूमिका स्पष्ट केली. कलम 370 माझ्या मते महत्त्वाचे नाही. 35अ हे कलम पाकिस्तानसाठी महत्त्वाचे आहे. कारण या कलमाच्या माध्यमातून ते काश्मीरची भौगोलिक रचना बदलण्याचा प्रयत्न करू शकतात. जो ते आत्ता करत आहेत. तो मुद्दा आमच्यासाठी महत्त्वाचा होता, आहे आणि राहणार आहे, असे ते म्हणाले.
दरम्यान, कुरेशी यांनी कलम 370वर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्याचे सांगितले. कलम 370 हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे. काश्मीरच्या लोकांनी म्हटले आहे, की तुम्ही आम्हाला वचन दिले होते. काश्मीरचे नागरिक नाराज झाले आहेत. हे प्रकरण भारतातल्या सर्वोच्च न्यायालयात अजूनही प्रलंबित आहे. लोकांनी त्याविरोधात आवाज उठवला आहे. कलम 35 अ किंवा कलम 370 यासंदर्भात भारत सरकारने घेतलेल्या निर्णयांविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या निर्णयांमधून भारताने कमावले कमी; पण गमावले जास्त असे मानणारा फार मोठा वर्ग तिथे आहे, असे कुरेशी म्हणाले.
वाद सोडविण्यासाठी चर्चा हाच एकमेव मार्ग
भारत आणि पाकिस्तानमधील वाद सोडवण्यासाठी चर्चा हाच एकमेव मार्ग असल्याचे कुरेशी यांनी नमूद केले. चर्चेशिवाय इतर कोणताही पर्याय नाही. भारत आणि पाकिस्तान ही दोन्ही अण्वस्त्रधारी राष्ट्र आहेत. या दोघांमध्ये काही तणावाचे मुद्दे आहेत. ते आज, उद्या किंवा परवा सोडवावेच लागतील. त्यावर युद्ध हा पर्याय नाही. युद्ध ही आत्महत्याच ठरेल, असे कुरेशी म्हणाले आहेत.
Copyright © 2023 lokshahiaghadi.com . 
Developed by Highclonoid softec.  
Powered By Siddhant Media.