मुंबई, दि. १५ जानेवारी : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई होणार असे वाटत असतानाच या प्रकरणाला वेगळे वळण लागले. बलात्काराचा आरोप करणार् या रेणू शर्मा हिच्याविरोधात हनी ट्रॅपच्या तीन तक्रारी आल्यानंतर तिने आपण माघार घेत आहोत, असे ट्वीट केले; परंतु त्याच वेळी तिच्या वकिलांनी लढण्याचा निर्धार केला. दरम्यान, मुंडे यांच्याविरोधात गंभीर आरोप असल्याने कारवाई करावी लागेल, असे सूतोवाच करणा-या शरद पवार यांनी काल परिस्थिती वेगळी होती, आज वेगळी आहे, असे सांगत मुंडे यांची चौकशी झाल्याशिवाय त्यांना मंत्रिपदावरून काढणार नाही, असे स्पष्ट केले.
मुंडे यांच्यावर थेट बलात्काराचा आरोप करून रेणू शर्मा यांनी महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली होती. या गंभीर आरोपांमुळे मुंडे यांच्या मंत्रिपदावर गंडांतर आल्याचे चित्र होते. विरोधकांनी मुंडे यांच्याविरोधात थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करून आमदारकीच रद्द करण्याची मागणी केली आहे. मुंडे खलनायक ठरत असतानाच भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष कृष्णा हेगडे, मनसेचे मनीष धुरी यांनी रेणूवर हनी ट्रॅपचे आरोप केले. तशी फिर्यादही दाखल झाली. रेणू शर्मा हिने जेट एअरवेज कंपनीत अधिकारी असलेल्या रिझवान कुरेशी नावाच्या तरुणाला छळल्याचा आरोप झाला आहे. पोलिसांकडे असलेल्या कागदपत्रांपैकी काही कागदपत्रे माध्यमांच्या हाती लागली आहेत. यावरून रेणू शर्मा हिने कुरेशी यांच्यासोबत सोशल मीडियावरून ओळख झाल्यानंतर मैत्री केली. त्यानंतर भेटीगाठी, हॉटेलिंग आणि असे बरेच काही दोन वर्षे चालले. त्यानंतर मात्र या महिलेने कुरेशी विरोधात याच आंबोली पोलिस ठाण्यात विनयभंगाची आणि बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल केली. या सर्व प्रकरणानंतर मुंडे यांच्यावरील डाग हळूहळू पुसट होताना दिसत आहेत. काही वर्षापूर्वी बीडमधील एका कार्यक्रमात मुंडे यांनी भाषणादरम्यान, तुम लाख कोशिशे करो मुझे बदनाम करने की,मै जब भी बिखरा हूं तब तब मै दुगनी रफ्तारसे निखरा हूँ हा शेर सादर केला होता. रेणू शर्मा प्रकरणात त्यांचा हाच शेर लागू होतो आहे, असे दिसत आहे.
मुंडे यांच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना इतकेच नाही, तर भाजप, मनसेतील लोक उभे राहत असल्याचे पाहून रेणू शर्मा यांनी माघार घेत असल्याचे ट्वीट केले. त्यानंतर ती पत्रकार परिषदही घेणार होती; परंतु ती पत्रकारांना सामोरी गेली नाही. तिचे वकील रमेश त्रिपाठी यांनी आरोपांचा तोच पाढा वाचून दाखविताना पोलिसांनी दखल न घेतल्यास न्यायालयात जाण्याचा तसेच मुंडे समर्थकांकडून धमक्या येत असल्याचा आरोप केला. बलात्काराचे व्हिडीओ असल्याचे त्यांनी सांगितले. रेणू शर्मा हिने आपल्याला एकाकी पाडले जात असून एवढ्यांच्याविरोधात मी लढले. त्या सर्वांची इच्छा असेल, तर माघार घेते, असे म्हटले.
शरद पवार यांनी आज या सर्व प्रकरणानंतर आपली भूमिका स्पष्ट केली. महिलेची तक्रार असल्याने हे प्रकरण गंभीर असल्याचे म्हटले होते; मात्र त्या महिलेविरोधातच तीन जणांनी तक्रार केली आहे. त्यामुळे पोलिस अधीक्षक दर्जाच्या महिला अधिका-याने या प्रकरणाची चौकशी करावी. तोपर्यंत मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, असे पवार यांनी ठामपणे सांगितले. मुंडे यांच्यावर थेट बलात्काराचा आरोप केल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या. असे असले तरी रेणू शर्मा यांच्याविरोधातही तक्रारी वाढत असल्याने हे प्रकरण रेणू शर्मांवरच बूमरँग होताना दिसत आहे. रेणू शर्मा आणि तिच्या भावाविरोधात मुंडे यांच्या मेहुण्याने यापूर्वीच तक्रार केली होती, असे स्पष्ट झाले आहे.
काचेच्या घरात राहून दगड मारू नका
काचेच्या घरात राहणा-यांनी दुस-याच्या घरावर दगड मारू नयेत, हा मंत्र सर्वांसाठी लागू आहे. खासकरुन बेताल विरोधी पक्षाला लागू आहे. हमाम मे सब नंगे आहेत याचे भान विरोधी पक्षाने ठेवायला हवे, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना इशारा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या निवडणूक अर्जासोबतच्या प्रतिज्ञापत्रात लग्नासंदर्भातील माहिती दडवल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता, याची आठवण पवार आणि राऊत यांनी भाजप नेत्यांना करून दिली.
मुंडेविरोधातील पुरावे पोलिसांना देऊ
मुंडे प्रकरणी आमच्याकडे पुरावे आहेत. हे पुरावे आम्ही पोलिसांकडे देऊ. या प्रकरणात पोलिस उद्या गुन्हा दाखल करतील अशी आशा आहे. पोलिसांनी एफआयआर दाखल नाही केला तर आम्ही न्यायालयात जाऊ, असा इशारा अॅड. रमेश त्रिपाठी यांनी दिला. केवळ रेणूची प्रतिमा मलिन करण्यासाठी आणि या प्रकरणावरून दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठीच तिच्यावर आरोप केले जात असून मुंडेंविरोधातील केस कमकुवत करण्याचा हा प्रकार आहे, असे त्यांनी सांगितले.
Copyright © 2024 lokshahiaghadi.com . 
Developed by Highclonoid softec.  
Powered By Siddhant Media.