मुंबई, दि. १५ डिसेंबर : केंद्रातील मोदी सरकारनं संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्द केल्याने राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना भाजपचे नाक दाबण्याची आयती संधी मिळाली आहे. संसद अधिवेशन रद्द झाल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. 'राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचा कालावधी कमी आहे अशी बोंब ठोकत महाविकास आघाडी सरकारला आठवे आश्चर्य म्हणणारा भारतीय जनता पक्ष हा जगातील सर्वात दांभिक आणि ढोंगी पक्ष आहे. मोदी सरकारनं कोविडमुळं संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्दच केलं. आता मोदींना कितवे आश्चर्य म्हणणार?,' असा बोचरा सवाल सावंत यांनी केला आहे.
राज्य विधिमंडळाचं दोन दिवसांचं अधिवेशन सध्या सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाचा कालावधी कमी करून दोन दिवसांचा करण्यात आला. त्यावरून राज्यातील विरोधी पक्ष भाजपनं सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. राज्य सरकार प्रश्नांपासून पळ काढतंय, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला होता. मात्र मोदी सरकारने संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्द केल्याने राज्यातील भाजप नेते तोंडघशी पडले आहेत.
Copyright © 2024 lokshahiaghadi.com . 
Developed by Highclonoid softec.  
Powered By Siddhant Media.