नाशिक, दि. २१ जून : मराठा समाजाच्या मागण्या सरकार मान्य करत आहे. सरकारने त्यासाठी 21 दिवसांची वेळ मागितली आहे. त्यामुळे मराठा समाजाचे मूक आंदोलन एक महिना पुढे ढकण्यात आल्याचे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले. नाशिक येथे पार पडलेल्या समन्वयकांच्या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली.
आम्ही मराठा समाजाची पाच मूक आंदोलने जाहीर केली होती. कोल्हापूरनंतर नाशिकला आंदोलन झाले. या दोन्ही आंदोलनाला अनेक मंत्री, आमदार, खासदार उपस्थित होते. कोल्हापूरचे आंदोलन झाल्यानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सरकार भेटायला तयार असल्याचे सांगितले आणि त्यानंतर आम्ही भेट घेतली. जवळपास तीन तास चर्चा झाली. त्यानंतर सरकारने आमच्याकडे 21 दिवसांचा वेळ मागितला. म्हणून तो आम्ही दिला आहे, असे त्यांनी सांगितले.
सरकारच्या वतीने येत्या गुरुवारी पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे आयोग स्थापन करू नका; पण गृहपाठ तरी करा, असे संभाजीराजे यांनी म्हटले. तसेच मूक आंदोलन स्थगित नसून या काळात आम्ही विविध जिल्ह्यांमध्ये जात समन्वयकांशी चर्चा करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.
सरकारने आमच्याकडे 21 दिवसांची वेळ मागितली, आम्ही म्हणतो महिना घ्या; पण मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करा. या दरम्यान आंदोलन सुरूच राहील. मराठा आरंक्षण रद्द झाले, तेव्हा दु:खी झालो होतो. त्यामुळे मराठा समाजाच्या मागण्यांसाठी राज्यभर मूक आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले होते. मराठा समाजाच्या सहा प्रमुख मागण्या सरकारपुढे मांडल्या आहेत. मराठा आरक्षणाची न्यायालयीन प्रक्रिया आहेत; मात्र इतर मागण्यांसंदर्भात सरकार सकारात्मक आहेत, असे त्यांनी सांगितले.
कोल्हापूरला सारथीसाठी जमिनीची पाहणी
सारथीला स्वायत्तता मिळणार आणि सारथीला 21 दिवसांत मोठा निधी जाहीर करणार असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सागितले. सारथीच्या आठ विभागीय कार्यालयांना सरकारने मंजुरी दिली आहे. कोल्हापूरला तातडीने उपकेंद्र सुरू केले जाणार आहे. यासाठी कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी जमिनीची पाहणी देखील केली. आता आम्ही सगळे जागेची पाहणी करून जागा निश्चित करू, असे संभाजीराजे यांनी सांगितले.
Copyright © 2024 lokshahiaghadi.com . 
Developed by Highclonoid softec.  
Powered By Siddhant Media.