मुंबई, दि. २७ नोव्हेंबर : आज सामनासाठी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या मुलाखतीवर नारायण राणेंनी टीका केली आहे. नाचता येईना अंगण वाकडे अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अवस्था असल्याचे नारायण राणे यांनी म्हटले आहे. या सरकारने गेल्या सहा महिन्यांमध्ये ६५ हजार कोटींचं कर्ज काढलं आणि राज्य दिवाळखोरीत नेलं असा आरोप नारायण राणे यांनी केला.
नारायण राणे म्हणाले, सत्तेत असणारं सरकार महाराष्ट्रासाठी पोषक नाही. त्यामुळे हे सरकार कोसळणार आहे. सरकार कोसळल्यानंतर काय होणार, असं म्हणत नारायण राणे यांनी दोन फॉर्म्युले देखील सुचवले आहेत. महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर इतर दोन पक्षांपैकी एका पक्षासोबत भाजपची युती होऊ शकते. किंवा राज्यात पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू शकते, असे दोन पर्याय नारायण राणे यांनी सुचवले आहेत. तसेच राज्यात पुन्हा निवडणुका होण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असं राणे यांनी यावेळी सांगितलं. शिवसेना- काँग्रेस- राष्ट्रवादी समीकरण होऊ शकतं तर राज्यात कोणतंही समीकरण होऊ शकतं, असे संकेतही नारायण राणे यांनी यावेळी दिले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूने नव्हते, त्यांना कधीही मराठा समाजाला आरक्षणाला समर्थन दिलेलं नाही. सुप्रीम कोर्टात चांगले वकील नेमण्याची गरज आहे असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.मातोश्रीच्या पिंजऱ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अडकले आहेत. ते कार चालवतात याचं संजय राऊत कौतुक करत आहेत. मात्र महाराष्ट्राला ड्रायव्हर नको आहे सक्षम मुख्यमंत्री हवा आहे अशीही टीका नारायण राणे यांनी केली आहे.
Copyright © 2024 lokshahiaghadi.com . 
Developed by Highclonoid softec.  
Powered By Siddhant Media.