हैदराबाद, दि १३ जुलै : कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपली नसल्याची चर्चा देशात सुरू असतानाच तिसरी लाट सुरू झाल्याची घोषणा अभ्यासकांनी केली आहे. हैदराबाद विद्यापीठातील प्रसिद्ध भौतिकशास्त्र आणि गणितज्ञ डॉ. विपीन श्रीवास्तव यांनी गेल्या दीड वर्षातील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीचा मॅट्रिक्सच्या आधारे अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे.
कोरोनाची दैनंदिन प्रकाशित होणारी आकडेवारी आणि पहिल्या दोन लाटांचे पॅटर्न यांचा तौलनिक अभ्यास केला असता, तिसरी लाट चार जुलै रोजी सुरू झाली आहे, असे श्रीवास्तव यांनी म्हटले आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जशी परिस्थिती होती, तशीची परिस्थिती जुलैच्या पहिल्या आठवड्यात होती, असे डॉ. श्रीवास्तव यांनी म्हटले आहे. लाटेची सुरुवात नेमकी कधी होते, हे समजण्यासाठी डॉ. श्रीवास्तव यांनी मुख्यत्वे तीन प्रकारच्या आकडेवारीचा उपयोग केल्याचे सांगितले. दैनंदिन आढळणारी रुग्णसंख्या, दैनंदिन बरे होऊन घरी जाणारी रुग्णसंख्या आणि दैनंदिन मृत्यू या तीन गोष्टींच्या आधारे लाटेची सुरुवात, कळस आणि लाट ओसरत असल्याचं सिद्ध करता येते, असे त्यांनी म्हटले आहे.
जेव्हा नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या ही बऱ्या होणाऱ्या रुग्णांपेक्षा वाढू लागते, तेव्हा परिस्थिती गंभीर होत असल्याचे मानले जाते; मात्र केवळ हा एकमेव निकष ग्राह्य धरता येत नाही. त्याबरोबरच जर दैनंदिन मृत्यूचेही प्रमाण वाढत असेल आणि हे सलग काही दिवस होत असेल, तर मात्र ती नव्या लाटेची सुरुवात मानली जाते. चार जुलैपासून ही परिस्थिती दिसायला सुरुवात झाल्याचे या आकडेवारीतून आणि मॅट्रिक्समधून स्पष्ट दिसत असल्याचे डॉ. श्रीवास्तव यांनी सांगितले.
तिसरी लाट काही दिवसांत फोफावेल
मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, हात धुणे, स्वच्छता बाळगणे यासारख्या गोष्टींचा नागरिकांनी अवलंब केला नाही, तर कोरोनाची तिसरी लाट काही दिवसांतच फोफावत असल्याचं दिसून येईल, असा इशारा डॉ. श्रीवास्तव यांनी दिला आहे.
Copyright © 2024 lokshahiaghadi.com . 
Developed by Highclonoid softec.  
Powered By Siddhant Media.