पुणे, दि. १४ मे : राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यातील वादावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रशासकीय अधिकारी आणि मंत्री यांच्यात कोणत्याही प्रकारचा वाद नसून काही आक्षेप असतील तर ते बैठक घेऊन समोरासमोर सोडवले जातील, असे पवार म्हणाले.
काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत पाटील यांनी मुख्य सचिवांना लक्ष्य केले होते. पाटील यांनी मुख्य सचिवांवर हल्लाबोल केल्याने बैठकीत उपस्थित मंत्री चकित झाले होते. पावसाळ्याच्या तोंडावर विभागाची विविध सिंचन प्रकल्प आणि कालव्यांशी संबंधित काही तातडीची कामे प्रस्तावित आहेत. या कामांना वित्त विभागाची मान्यता मिळाली असून नस्ती मंजूर झाल्यानंतर त्यावर पुढील कार्यवाही करण्याऐवजी कुंटे यांनी या नस्ती पुन्हा वित्त विभागाकडे पाठविल्यावरून पाटील नाराज असल्याचे बोलले जाते. याबाबत पवार यांनी विचारण्यात आले असता त्यांनी कोणताही वाद नसल्याचे स्पष्टीकरण दिले. राज्यातील प्रशासकीय अधिकारी आणि मंत्र्यांमध्ये उत्तम समन्वय आहे. कोणताही वाद असण्याचे कारण नाही. पाटील हे अतिशय शांत स्वभावाचे आहेत. उलट मी त्यांच्यापेक्षा तापट स्वभावाचा आहे. अधिकार्यांसोबत काही मतभेद असतील तर ते बैठक घेऊन समोरासमोर सोडवले जातील आणि योग्य त्या सूचना करण्यात येतील, असे पवार यांनी सांगितले.
पुण्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. या वेळी पवार यांनी पुण्यातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेतला. यात लसीकरणाच्या मुद्द्यावर त्यांनी जोर दिला. देशात सर्व नागरिकांसाठी लस गरजेची आहे. लसीकरण झालेल्या ठिकाणी कोरोना आटोक्यात आल्याचे दिसून आले आहे; पण लस उत्पादन क्षमता मर्यादित आहे. दहा कोटींपर्यंत लस उत्पादन करण्याचे नियोजन आहे, असे पवार यांनी सांगितले. राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याच अनुषंगाने पुण्यातही तिसर्या लाटेसाठीची पूर्वतयारी सुरू करण्यात आल्याची माहिती पवार यांनी या वेळी दिली. ऑक्सिजनबाबतची राज्याची 1200 टनाची तयारी आता 1800 ने वाढवायची आहे. प्रशासन यंत्रणा रात्रंदिवस काम करते आहे. तिसर्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे तहान लागल्यावर विहीर न खोदता, तिसर्या लाटेची तयारी याआधीच सुरू करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
’भारत बायोटेक’ला जागा देणार
’भारत बायोटेक’ने जिल्ह्यात 28 एकर जमीन मागितली आहे, ती देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. तो प्रकल्प सुरू होण्यासाठी तीन महिने लागतील. तिथे तयार होणारी लस निम्मी केंद्राला द्यावी लागेल; पण राहिलेली लस महाराष्ट्राला मिळाली पाहिजे, असा आग्रह पवार यांनी धरला आहे.
Copyright © 2024 lokshahiaghadi.com . 
Developed by Highclonoid softec.  
Powered By Siddhant Media.