All News

ऑक्सिजनअभावी मध्य प्रदेशात 22 कोरोनाबाधितांचा मृत्यू

ऑक्सिजनअभावी मध्य प्रदेशात  22 कोरोनाबाधितांचा मृत्यू

भोपाळ, दि. २० एप्रिल :   मध्य प्रदेशमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेक ठिकाणी गोंधळ निर्माण झाला आहे. कोरोनामुळे राज्यातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढत असतानाच ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे यात आणखीन भर पडली असून रुग्णांच्या नातेवाइकांना चांगलीच धावपळ करावी लागत आहे. शहडोल येथे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे 12 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या सुरक्षेसंदर्भातील प्रश्‍न उपस्थित केले जात आहे. आश्‍चर्याची बाब म्हणजे असाच प्रकार भोपाळमधील एका रुग्णालयातही घडला आहे. 


मध्य प्रदेशची राजधानी असणार्‍या भोपाळमधील पीपल्स हॉस्पिटल नावाच्या रुग्णालयामध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे दहा रुग्णांचा मृत्यू झाला. यानंतर एकच गोंधळ उडाला आहे. रुग्णालय प्रशासनाने हे वृत्त फेटाळले आहे. सकाळी रुग्णालयातील ऑक्सिजनच्या पुरवठ्याला नक्कीच फटका बसला होता; मात्र त्यामुळे कोणाचाही मृत्यू झालेला नाही असा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे.


गेल्या काही दिवसांपासून या रुग्णालयातील रुग्णांचे नातेवाइक ऑक्सिजनच्या पुरवठ्यासंदर्भातील तक्रारी सातत्याने रुग्णालय प्रशासनाकडे करत होते. रुग्णालयामध्ये दाखल होणार्‍यांना यासंदर्भातील माहिती कर्मचार्‍यांकडूनच दिली जात आहे. रुग्णालयातील ऑक्सिजनचा पुरवठा रात्रभर पुरेसा असला, तरी सकाळी तो संपतो. अशाच प्रकारे सोमवारी सकाळी ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाल्याने दहा  रुग्णांचा मृत्यू झाल्याचा दावा रुग्णांच्या नातेवाइकांनी केला आहे, तर दुसरीकडे रुग्णालय प्रशासनाने हे मृत्यू प्रकृती खालावल्याने झाल्याचे सांगण्यात आला आहे. ऑक्सिजनचा पुरवठा कमी जास्त प्रमाणात होत असतो अशी सारवासारवही रुग्णालयाने केल्याचे वृत्तात म्हटले आहे. 


दोन दिवसांपूर्वीच शहडोलमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने कोरोनाच्या 12 रुग्णांना प्राण गमावावा लागला होता. ही घटना शहडोल मेडिकल कॉलेजमध्ये घडली. शहडोलचे जिल्हाधिकारी अर्पित वर्मा यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला होता. मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री 12 वाजता रुग्णालयातील ऑक्सिजनचा दाब अचानक कमी झाला आणि रुग्णांना ऑक्सिजन कमी प्रमाणात पुरवला जाऊ लागला. रुग्णांची तडफड पाहून नातेवाइकांनी मास्क दाबून योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळेल यासाठी धावपळ केली; मात्र त्यांना यामध्ये यश आले नाही. सकाळी सहा वाजेपर्यंत अशाच परिस्थितीत नातेवाइकांनी रात्र काढली; मात्र सहाच्या आसपास 12 रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला. आतापर्यंत मध्य प्रदेशमधील भोपाळ, सागर, जबलपूर आणि उज्जैनमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याचे प्रकार समोर आले आहेत.

Advertisement

test 4 test2 IBPS Highclonoid Softec Pvt Ltd