नवी दिल्ली, दि. १७ मार्च : निवडणूक आयोगाने आगामी पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत 331 कोटी रुपये जप्त केले आहेत. हे पैसे निवडणूक प्रभावित करण्यासाठी वापरण्यात येणार होते. निवडणूक आयोगाने उमेदवार निहाय निवडणूक खर्चाची मर्यादा ठरवून दिलेली आहे; मात्र अनेक उमेदवारांकडून बेकायदेशीरपणे मतदारांना प्रभावित करण्यासाठी काळ्या पैशांचा उपयोग होतो. त्यामुळेच ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. निवडणूक आयोग या पाचही राज्यांमधील निवडणूक खर्चावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. पश्चिम बंगाल, आसाम, तामीळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या सर्व राज्यांमध्ये ही कारवाई केल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले.
निवडणूक आयोगाने या आगामी निवडणुकांमध्ये काळ्या पैशांचा दुरुपयोग होऊ नये, म्हणून या राज्यांमध्ये 295 निरीक्षकाची नियुक्ती केली आहे. या कारवाईत रोख रक्कम, दारु, लाच, महागडे साहित्य आणि ड्रग्जचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार जप्त करण्यात आलेली ही रक्कम याच राज्यांमध्ये 2016 मधील निवडणुकीत जप्त केलेल्या रकमेच्या कितीतरी अधिक आहे. विशेष म्हणजे यंदा या राज्यांमधील निवडणूक प्रक्रिया अद्याप सुरुवातीच्याच टप्प्या आहे, त्यातच इतका खर्च झाला आहे.
आयोगाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंतच्या कारवाईत आसाममध्ये रोख रकमेसह एकूण 63 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुद्दुचेरीतून 5.72 कोटी रुपये, तामीळनाडूतून 127.64 कोटी, केरळमधून 21.77 कोटी आणि पश्चिम बंगालमधून 112.59 कोटी रुपये जप्त करण्यात आले.
Copyright © 2024 lokshahiaghadi.com . 
Developed by Highclonoid softec.  
Powered By Siddhant Media.