जळगाव, दि. ११ मे : जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात मन पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली आहे. येथील एका घराला लागलेल्या आगीत पती व पत्नीचा होरपळून मृत्यू झाला. तालुक्यातील गारखेडा गावात ही दुर्दैवी घटना सोमवारी मध्यरात्री घडली आहे. उत्तम श्रावण चौधरी (47) व वैशाली उत्तम चौधरी (44) अशी या दाम्पत्याची नावे आहेत.
चौधरी दाम्पत्य घरात झोपलेले असताना रात्री दोन वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. भुसावळ-जामनेर रस्त्यावरुन जात असलेल्या ट्रकचालकास घरातून धूर निघताना दिसल्यानंतर त्या ट्रक चालकाने ग्रामस्थांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर, ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. घराचा दरवाजा आतून बंद असल्याने घरात प्रवेश करण्यास त्यांना त्रास झाला. अखेर, स्थानिकांच्या मदतीने ग्रामस्थांनी घराचा दरवाजा तोडला असता, समोरील वेदनादायी चित्र पाहून सर्वांचेच मन हेलावले. दरम्यान, चौधरी यांना विवाहित मुलगी व एक मुलगा आहे.
Copyright © 2024 lokshahiaghadi.com . 
Developed by Highclonoid softec.  
Powered By Siddhant Media.