वचनपूर्तीच्या राजकारणासाठी भाजपाचे नवे पाऊल
प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांच्याकडून
जाहीरनाम्यातील आश्वासनपूर्तीची माहिती सादर
गेल्या निवडणुकीतील जाहीरनाम्यातील आश्वासनांची पूर्तता कशी झाली, याचा अहवाल जनतेला सादर करत वचनपूर्तीच्या राजकारणाची नवीन प्रथा भारतीय जनता पार्टीने शनिवारी सुरू केली. भाजपाच्या 2014 च्या विधानसभा निवडणुकीतील जाहीरनाम्यातील बहुतेक आश्वासने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा महायुती सरकारने पूर्ण केली किंवा त्यासाठी महत्त्वाचे काम सुरू केले, असे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी मुंबईत सांगितले.
भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश प्रवक्ते मधू चव्हाण उपस्थित होते.
मा. माधव भांडारी म्हणाले की, जाहीरनाम्यातील आश्वासने पूर्ण करण्यासाठी नसतात असे उद्गार काँग्रेसच्या एका मुख्यमंत्र्यांनी काढले होते. अशी जाहीरनाम्याबाबत विविध पक्षांची भूमिका राज्याने अनुभवली आहे. या पार्श्वभूमीवर आपण आज भाजपा सरकारने गेल्या पाच वर्षांत कोणती आश्वासने पूर्ण केली यासाठी नमुन्यादाखल 25 आश्वासनांविषयी माहिती देत असून लवकरच पक्षातर्फे जाहीरनामा अंमलबजावणीचे सविस्तर रिपोर्ट कार्ड प्रसिद्ध करण्यात येईल.
त्यांनी सांगितले की, गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचा जाहीरनामा दृष्टीपत्र या नावाने प्रसिद्ध झाला होता. एलबीटी रद्द करू, महाराष्ट्र लोडशेडिंगमुक्त करू, इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारू, मराठा आरक्षणाला पाठिंबा, शेतकऱ्यांना पेन्शन योजना, कृषी पंपांना वीज पुरवठा, शेतमाल शेतकऱ्यांना मर्जीप्रमाणे विकता येण्यासाठी कायद्यात बदल, गोवंश हत्याबंदी कायदा लागू करणे, गरीबांसाठी आर्थिक निकषावर आरक्षण लागू करणे, श्रमिक पत्रकारांना पेन्शन योजना लागू करणे, ऊसतोडणी कामगारांसाठी महामंडळ स्थापन करणे, मालगुजारी तलावांचे पुनरुज्जीवन करणे, गिरगाव चौपाटीवरील लोकमान्य टिळक यांच्या समाधीस्थळाला स्वराज्यभूमी नाव देणे, अशी अनेक आश्वासने भाजपाच्या सरकारने पूर्ण केली आहेत किंवा त्यांच्या पूर्ततेसाठी भरघोस काम केलेले आहे व ती लवकरच पूर्ण होतील.
Copyright © 2024 lokshahiaghadi.com . 
Developed by Highclonoid softec.  
Powered By Siddhant Media.