मुंबई, दि. १९ फेब्रुवारी : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून पुन्हा एकदा राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष निर्माण झाला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावरून सरकारवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. ‘हे सरकार आपल्याच आमदारांना घाबरत आहे. आपल्याच आमदारांना इतके घाबरणारे सरकार मी पहिल्यांदाच पाहतो आहे’, असे ते म्हणाले.
नियमावलीनुसार विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राज्यपाल आधी तारीख ठरवून पाठवतात. ती निवडणूक सिक्रेट बॅलटने होते; पण गेल्या काही दिवसांमधल्या चर्चा पाहिल्या, तर हे सरकार आपल्याच आमदारांना घबरत असल्याचे दिसते. आपला उमेदवार पडतोय की काय, याचीच सरकारला जास्त भीती आहे. त्यामुळे आमचे मनोरंजन होते आहे आणि आमदारांचे भले होते’, अशा शब्दांत फडणवीस यांनी सरकराची पिसे काढली.
अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांनी शेतकरी आंदोलनासंदर्भात केलेल्या ट्वीटवरून नाना पटोले यांनी सिनेमाचे शूटिंग बंद पाडण्याच्या दिलेल्या इशार्याला फडणवीस यांंनी पब्लिसिटी स्टंट म्हटले आहे. त्यांना माहिती आहे, की अमिताभ बच्चन, अक्षय कुमार यांच्यावर काही बोलले, तर पब्लिसिटी मिळते. यात त्यांचेच भले आहे. नवेनवे अध्यक्ष झाले आहेत. त्यांनाही त्यांचे नाव कमवायचे आहे. त्यामुळे त्यांना वाटते, की दिवसभर पब्लिसिटी मिळते. शूटिंग कसे आणि कोण बंद करू शकते? इथे कायद्याचं राज्य आहे. तुम्ही सत्तारूढ पक्षाचे आहात याचा अर्थ असा नाही की तुम्ही मालक झालात’, असे फडणवीस म्हणाले.
Copyright © 2024 lokshahiaghadi.com . 
Developed by Highclonoid softec.  
Powered By Siddhant Media.