पुणे दि. २१ मार्च : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी सचिन वाझे यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दर महिन्याला शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते, असा आरोप केला आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून या प्रकरणी राज्य सरकार बरखास्त करण्यात यावे, अशी मागणी वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे उद्या सोमवारी ही मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, की हे सरकार चोरांचे, खुन्यांचे असून ते बरखास्त करण्यात यावे, अशी आमची मागणी आहे. उद्या सोमवारी दुपारी वंचितचे एक शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेऊन ही मागणी करणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकारणातील क्रिमिनल एलिमेंट व अॅडमिनिस्ट्रेटिव्हमधील क्रिमिनल एलिमेंट एकत्र येऊन काय काय घडवून आणू शकतात याचे चित्र आपण पाहात आहोत. मुंबईच्या माजी पोलिस आयुक्तांनी शंभर कोटी रुपये कसे वसूल केले हे स्पष्ट करण्यात आले आहे. हा आकडा आमच्या दृष्टीने कमी असला तरी त्यामध्ये नेक्सेस उभे आहे, असे त्यांनी सांगितले.
उद्या दुपारी सव्वाबारा वाजता राज्यपालांनी भेटीची वेळ दिली असून त्यांना वंचित बहुजन आघाडीच्यावतीने निवेदन देणार आहोत. हे सरकार बरखास्त करावे; मात्र सरकार बरखास्त करीत असताना सभागृह बरखास्त करू नये, असेही राज्यपालांना सांगणार असल्याचे अॅड. आंबेडकर यांनी सांगितले. वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष डॉ. अरुण सावंत, अॅड. धनराज वंजारी तसेच महिला आघाडीच्या अध्यक्ष रेखा ठाकूर हे या शिष्टमंडळात असतील.
Copyright © 2024 lokshahiaghadi.com . 
Developed by Highclonoid softec.  
Powered By Siddhant Media.