मुंबई, दि. १३ : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नवी दिल्लीत राष्ट्रीय अध्यक्षपद किंवा अन्य एखादी केंद्रीय जबाबदारी देण्यात येईल, अशी चर्चा काही दिवसांपूर्वी सुरू होती. मात्र केंद्रीय नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत फडणवीस हेच राज्यात पक्षाचे सर्वोच्च नेते असतील, तसेच विधानसभा निवडणुकीत निर्णयाचे सर्वाधिकार त्यांच्याकडेच असतील, असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुंबई भाजपचे अध्यक्ष अॅड. आशीष शेलार यांनी दिली. बैठकीस फडणवीस, शेलार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव, केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे, सह सरचिटणीस शिवप्रकाश, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, पंकजा मुंडे आदी नेते उपस्थित होते. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीतील जागावाटप आणि भाजप उमेदवार ठरविण्याचे निर्णय घेण्याचे सर्वाधिकार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असतील. महायुतीत 288 पैकी किमान 150 जागा भाजपला सोडवण्याची अट पक्षानं देवेंद्र फडणवीस यांच्यावर टाकली आहे.