IMG-LOGO
राष्ट्रीय

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेने भाजपमधील केंद्रीय नेतृत्व नाराज

Wednesday, Aug 28
IMG

राज्य सरकारमधील काही मंत्र्यांनी केलेल्या हास्यास्पद विधानांमुळेही भाजपमधील केंद्रीय नेते नाराज झाल्याचे समजते.

दिल्ली, दि. २८ : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेचाही प्रचार ‘महायुती’कडून वाजतगाजत केला जात आहे. अशावेळी शिवपुतळा कोसळण्याची घटना ‘महायुती’च्या लोककल्याणाच्या योजनांच्या प्रचारामध्ये अडथळा निर्माण करू शकते. त्यामुळे अशी संवेदनशील प्रकरणे राज्य सरकारच्या स्तरावर अत्यंत काळजीपूर्वक व सबुरीने हाताळली गेली जावीत, असे भाजपच्या केंद्रीय नेत्यांचे म्हणणे असल्याचे समजते.राज्य सरकारमधील काही मंत्र्यांनी केलेल्या हास्यास्पद विधानांमुळेही भाजपमधील केंद्रीय नेते नाराज झाल्याचे समजते. राज्य सरकारने कोणतेही आढेवेढे न घेता या प्रकरणाची हाताळणी केली असती तर अधिक योग्य ठरले असते. ही घटना कोणामुळे झाली व कोणाची जबाबदारी यावर भाष्य करण्यापेक्षा झाल्या प्रकाराबद्दल लोकांमधील असंतोष वाढू न देण्याची दक्षता घेणे गरजेचे आहे, असाही मुद्दा भाजपच्या केंद्रीय नेत्यांमध्ये चर्चिला गेल्याचे समजते. ४ डिसेंबरमध्ये नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण झाले होते. नौदल आणि मोदी यांच्या संदर्भामुळे या घटनेचा ठपका केंद्र सरकारवर लावला जाण्याचा तसेच, त्याचा राजकीय गैरफायदा विरोधकांच्या महाविकास आघाडीकडून घेतला जाण्याचा धोका असू शकतो. त्यामुळे शिवपुतळा कोसळण्याच्या घटनेचे पडसाद थेट केंद्रापर्यंत येऊ नयेत, याची खबरदारी घेतली जात असल्याचे समजते.

Share: