IMG-LOGO
महाराष्ट्र

जेव्हा सिनेमा काढेन, तेव्हा अनेकांचे मुखवटे फाटतील : देवेंद्र फडणवीस

Sunday, Jul 21
IMG

‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ २०२२ मध्ये दिग्दर्शित झालेल्या या चित्रपटाचा दुसरा भाग आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मुंबई, दि. २१ :  धर्मवीर सिनेमा ज्यांनी ज्यांनी पाहिला, त्यांना या सिनेमाने चेतवले. सिनेमा ज्यावेळी प्रदर्शित झाला, तेव्हा याचा भाग दोन येईल, हे कुणाला माहीत नव्हते. चित्रपटाबरोबरच शिंदे यांच्या जीवनाचा भाग दोन येईल, याचीही कुणाला कल्पना नव्हती. पण तोही भाग दोन लवकरच सुरू झाला. आता मलादेखील एक सिनेमा काढायचा आहे. मी जेव्हा सिनेमा काढेन, तेव्हा अनेकांचे मुखवटे फाटले जातील, अनेकांचे खरे चेहरे समोर येतील. योग्य वेळ आली की, निश्चितच मी सिनेमा काढणार”, असे सूचक विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘धर्मवीर २’ चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाच्या कार्यक्रमात केले.शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ २०२२ मध्ये दिग्दर्शित झालेल्या या चित्रपटाचा दुसरा भाग आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे मंगलप्रभात लोढा, भाजप मुंबई प्रदेशाध्यक्ष आशीष शेलार, खासदार श्रीकांत शिंदे, अभिनेता सलमान खान, जितेंद्र, महेश कोठारे, अशोक सराफ, गोविंदा आदी उपस्थित होते. हा चित्रपट ९ ऑगस्ट रोजी मराठी आणि हिंदी भाषेत प्रसिद्ध होणार आहे. धर्मवीर ही सत्यकथा आहे. एक व्यक्ती सामान्यातून असामान्य कसा होतो आणि अनेक लोकांना असामान्य कसा बनवतो, हे दिघे साहेबांच्या जीवनातून आपल्याला पाहायला मिळते. “विचारांशी गद्दारी झाली म्हणून एकनाथ शिंदे सरकार सोडून बाहेर आले. पण दुर्दैवाने तुम्हाला गद्दार म्हणून हिणवले गेले. पण ज्यावेळी आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या लोकांची ताकद पाठीशी असते, तेव्हा कितीही हिणवले गेले, तरीदेखील खरे सोने काय आहे, हे महाराष्ट्राची जनता हेरते आणि शिंदे यांचे नेतृत्व महाराष्ट्राने स्वीकारले”, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. तरडे यांनी आतापासूनच धर्मवीर ३ आणि ४ ची तयारी सुरू करावी. कारण दिघे साहेबांनी जो शिष्य तयार केला आहे, तो पुढचे १५-२० वर्ष तरी थांबणार नाही. हा मला विश्वास आहे”, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

Share: