मालिकांमध्ये बांगलादेशला कधीही टीम इंडियाला कसोटी सामन्यात पराभूत करता आलेले नाही.
चेन्नई, दि. १५ : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची मालिका १९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. हे दोन्ही देश एकमेकांचे शेजारी आहेत आणि यापूर्वी अनेक कसोटी मालिकांमध्ये आमनेसामने आले आहेत. विशेष म्हणजे, बांगलादेशचा संघ पाकिस्तानला पाकिस्तानात हरवून भारतात आला आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावलेला असेल. बांगलादेशने पाकिस्तानला २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० अशी धुळ चारली होती. दरम्यान, भारत आणि बांगलादेश कसोटी मालिकेसाठी दोन्ही देशांनी आपापले संघ जाहीर केले आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टिकोनातून ही मालिका खूप महत्त्वाची असेल. बांगलादेशने भारताविरुद्ध कसोटी मालिका जिंकली नाही. तसेच, आजपर्यंत झालेल्या सर्व ८ मालिकांमध्ये बांगलादेशला कधीही टीम इंडियाला कसोटी सामन्यात पराभूत करता आलेले नाही. दोन्ही संघांनी आतापर्यंत १३ कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी ११ वेळा भारताने विजय मिळवला असून २ सामने अनिर्णित राहिले आहेत. भारत आणि बांगलादेश यांच्यातील आगामी मालिका १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. पहिला सामना १९ सप्टेंबरपासून चेन्नईत, तर दुसरा सामना कानपूरमध्ये २७ सप्टेंबरपासून खेळवला जाणार आहे.