वसंत व्याख्यानमालेत स्व. डॉ. दौलतराव आहेर स्मृती व्याख्यानात ते 'आम्ही नाशिककर' या विषयावर बोलत होते.
नाशिक, दि. १९ : भक्ती, शक्ती आणि मुक्ती करिडोर व्हावे. या तिन्हीचे केंद्रबिंदू नाशिकला आहे. पाण्याच्या उपलब्धतेबाबतही नाशिक आग्रेसर आहे. त्यामुळे हेच व्हिजन घेऊन भविष्यात नाशिकचा औद्योगिक विकास व्हायला हवा, असे प्रतिपादन येथील जगप्रसिद्ध कंपनी ई. एस.डी.एस. सॉफ्टवेअर सोल्युशन्सचे चेअरमन पियुष सोमाणी यांनी येथे केले. वसंत व्याख्यानमालेत स्व. डॉ. दौलतराव आहेर स्मृती व्याख्यानात ते 'आम्ही नाशिककर' या विषयावर बोलत होते. सुरुवातीला स्व. डॉ. दौलतराव आहेर यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रफीत दाखवून व त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले. सप्तशृंगी मेडिकल कॉलेजचे चेअरमन डॉ. बाळासाहेब आहेर व्यासपीठावर उपस्थित होते. ज्येष्ठ गुंतवणुक सल्लागार प्रमोद पुराणिक यांनी श्री. सोमाणी यांचे, तर राजेंद्र बाफणा यांनी डॉ. आहेर यांचे स्वागत केले. व्याखानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. श्री. सोमाणी म्हणाले की, आम्ही टेक्नॉलॉजी क्षेत्रात असलो तरी मूळचे नाशिककर आहोत. त्यामुळे नाशिकच्या व्हिजनबद्दल एक पुस्तक लिहिले असून त्यात जे मांडले, तेच माझे मनोगत आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने बदल होत असतात. त्याच्या वेगाशी आपण स्पर्धा करू शकत नाही. नाशिकबद्दल बाहेरील लोकांच्या भावना वेगळ्या आहेत. त्यांच्या दृष्टीने नाशिक ही फक्त धार्मिक भूमी आहे. याचे कारण म्हणजे येथील अन्य वैशिष्ट्य लोकांपर्यंत पोहचवीण्यास कमी पडतो. महापराक्रमी लव आणि कुश यांच्यासारख्या मुलांचे निर्माण करणाऱ्या सीतेची ही भूमी आहे. वणी, त्र्यंबकेश्वर आणि शिर्डीच्या रूपाने आपल्याकडे भक्ती-शक्ती आणि मुक्तीचा त्रिवेणी संगम आहे. जिल्ह्यात तब्बल 36 धरणं आहेत. याचा विचार करता येत्या पाच वर्षांत नाशिकलगतच्या परिसरात विकास व्हायला हवा, असे नाशिककर म्हणुन आपले व्हिजन असावे. आपण दिल्लीत पौहचणे गरजेचे आहे. समृद्धी, चेन्नई-सूरत महामार्ग आणि नाशिक व शिर्डी असे दोन विमानतळ आपल्याला लाभलेले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात विकासाची दिशा नाशिककडे वळणार आहे. त्या दृष्टीने आपण तयारी करावी लागणार आहे. या अनुषंगाने महाराष्ट्रातून दिल्लीवर राज्य करायची संधी नाशिकला आहे. विकासाच्या दृष्टीने पुणे- मुंबईने ज्या चुका केल्या त्या आपण टाळल्या पाहिजे. शिवाजी राजांनी जसे 300 किल्ले हाताशी ठेऊन स्वराज्य स्थापन केले, त्याच धर्तीवर आपणही छोटी- छोटी शक्तीस्थळे विकसित केली पाहिजेत. त्याचबरोबर आयौध्येत जसे रामाचे भव्य मंदिर झाले तसेच नाशिकला सीतेचे भव्य मंदिर व्हावे अशी आपली इच्छा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रा. डॉ. कृष्णा शहाणे यांनी आभार मानले.दरम्यान, सुप्रसिद्ध पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त रोटरी क्लब ऑफ नाशिक रोड यांच्या वतीने भक्ती महोत्सवचा तिसरा व अंतिम भाग सादर करण्यात आला. यामध्ये अश्विनी सरदेशमुख व सहकाऱ्यांनी 'मोगरा फुलला' हा सदाबहार मराठी भक्ती गीतांचा कार्यक्रम सादर केला. गणेश गायकवाड यांनी निवेदन केले.