रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ महायुतीत कोणाला जाणार यावरून ओढाताण सुरू होती.
दिल्ली, दि. १८ : रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून भाजपने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर केली. उमेदवारी अधिकृतपणे जाहीर होण्यापूर्वी राणे यांनी प्रचाराला सुरुवात केली होती. ही जागा सोडण्यास शिंदे गटाचा तीव्र विरोध होता. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपल्या भावाच्या उमेदवारीकरिता सारी ताकद पणाला लावली होती. रत्नागिरीमध्ये शिवसेनेचेचाच उमेदवार निवडून येऊ शकतो, असे सामंत यांचे म्हणणे होते. पण भाजपने रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा राणे यांच्यासाठी प्रतिष्ठेची केली होती. शेवटी महायुतीत ही जागा भाजपने बळकावली आहे.रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ महायुतीत कोणाला जाणार यावरून ओढाताण सुरू होती. शिवसेना शिंदे गट ही जागा लढवण्यासाठी आग्रही होता. उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधु किरण सामंत हे निवडणूक लढण्यास इच्छुक होते. त्यांनी प्रचाराची सुरूवातही केली होती. शिवाय त्यांनी उमेदवारी अर्जही घेतला होता. मात्र त्याच वेळी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने आपली उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेतून नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांच्या पदरात निराशा पडली आहे. शिवाय आणखी एक हक्काचा मतदार संघही हातून गेला आहे. नारायण राणे यांना उमेदवारी दाखल झाल्यानंतर ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत. 19 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी महायुतीकडून मोठं शक्तीप्रदर्शन केलं जाईल. राणे यांनी या आधीच उमेदवारी अर्ज घेतला आहे.