राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली आहे.
मुंबई, दि. २६ : मालवणच्या समुद्रकिनारी उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी दुपारच्या सुमारास कोसळला आहे. जोरदार वाऱ्यामुळे हा पुतळा कोसळल्याचे सांगितले जात आहे. यावर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, देशाचे पंतप्रधान जेंव्हा एखाद्या स्मारकाचे तथा वास्तूचे उद्घाटन करतात तेव्हा त्याचे काम दर्जेदारच असेल अशी जनतेला खात्री असते. परंतु सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा वर्षभरातच कोसळला. हा छत्रपती शिवरायांचा अवमान आहे. विशेष म्हणजे या स्मारकाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या हस्ते ४ डिसेंबर २०२३ रोजी करण्यात आले होते. ज्याअर्थी एक वर्षही पुर्ण न होता हा पुतळा कोसळला त्याअर्थी त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले होते हे उघड आहे. या अर्थाने हि प्रधानमंत्री महोदयांची आणि जनतेची देखील उघड फसवणूक आहे. या पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे का झाले यासह इतर अनेक गोष्टींची कसून चौकशी होणे गरजेचे आहे.कुडाळचे आमदार वैभव नाईक यांनी या घटनेबद्दल संताप व्यक्त करत म्हटले आहे की, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने एक वर्षाच्या आतच पुतळा कोसळला आहे. महाराजांचा पुतळा कोसळल्याने आम्हाला दु:ख होत असून एक शिवप्रेमी म्हणून आम्ही याचा निषेध करतो. केवळ सहा महिन्यापूर्वीत कोट्यवधी रुपये खर्च करून हा पुतळा उभारण्यात आला होता . ज्यावेळी काम सुरू होते त्यावेळी स्थानिक लोकांनीही कामासंदर्भात तक्रारी केल्या होत्या. याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले.