ज्याचं खाल्लं त्याचं जागलं पाहिजे. सरकार देत राहते पण सरकारला आशीर्वादही दिला पाहिजे, असं रवी राणा म्हणाले.
जळगाव, दि. १३ : आगामी विधानसभा निवडणुकीत मतरुपी आशीर्वाद न दिल्यास, लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढून घेईन, असं विधान आमदार रवी राणा यांनी सोमवारी अमरावतीत एका कार्यक्रमात बोलताना केलं होतं. या विधानावरून विरोधकांकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जाते आहे. दरम्यान, यावरून आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आमदार राणा यांचं नाव न घेता त्यांना सुनावलं आहे. जळगावात लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आमचे काही मित्र गंमती गंमतीत बोलताना काहीही बोलतात. कुणीतरी म्हणतं पैसे परत घेऊ, पण वेड्यांनो या देशात भाऊबीज कधीच परत घेतली जात नाही. एकदा भाऊबीज दिली, की त्याच्या बदल्यात केवळ प्रेम मिळते. त्यामुळे कुणी मत दिलं किंवा नाही दिलं, तरी ही योजना बंद केली जाणार नाही. कुणाचा बाप ही योजना बंद करू शकत नाही”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.