नवी दिल्ली, दि. ८ जून : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत एकांतात अर्धा तास चर्चा केली. मोदी-ठाकरे यांच्या एकांतात झालेल्या या भेटीमुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची कूस बदलणार का?, अशी चर्चाही या निमित्ताने होत आहे.
या भेटीनंतर ठाकरे यांनी महाराष्ट्र सदन येथे येऊन प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ‘मोदी आणि आमचे व्यक्तिगत संबंध आहेत. हे सर्वांना माहीत आहे. ही गोष्ट लपलेली नाही आणि लपवण्याची गरज नाही. आज आम्ही राजकीयदृष्ट्या एकत्र नाही; पण म्हणून आमचे नाते तुटलेले नाही. मी मोदींना भेटलो म्हणजे काही तरी चूक केली असे नाही. मी काही नवाब शरीफांना भेटलो नाही. आताही माझ्या सहकार्यांना सांगून मी मोदी यांना भेटायला जाऊ शकतो’, असं सांगतानाच सत्तेत एकत्र नसलो, तरी नाते तुटले नाही, असे सूचक विधान मुख्यमंत्र्यांनी केले.
दरम्यान, मोदी-ठाकरे यांच्या भेटीवर भाजपतून उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. याबाबत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले, की चांगल्या वातावरणात चर्चा झाली असेल, नाते तुटले नाही, असे ठाकरे म्हणत असतील तर हे नाते कायमस्वरुपी असायला हवे. दिल्लीत आले म्हणून पंतप्रधानांबाबत किंवा भाजपबरोबरच्या नात्याबाबतचे वक्तव्य महाराष्ट्राने पाहिले आहे. मोदी यांच्या चर्चेवर त्यांना समाधान मिळाले असेल आणि नाते तुटले नाही, असे सांगत असतील तर आम्हाला आनंद आणि अभिमान आहे. महाराष्ट्राच्या हितासाठीही ते चांगले आहे. नात्याच्याबाबतीत मुख्यमंत्र्यांनी नात्याबाबत अशा प्रकारची भूमिका घेतली असेल तर येणार्या काळात कशाप्रकारे पडसाद उमटतील हे पाहायला मिळेल, असे सूचक विधानही त्यांनी केले.
मोदी-ठाकरे भेटीच्या निमित्ताने शिवसेना-भाजप राजकीयदृष्ट्या जवळ येतील असे वाटत नाही; पण मधल्या काळात त्यांच्यात जी कटुता निर्माण झाली होती. ती दूर व्हायला सुरुवात होईल. महाराष्ट्रात आपली सत्ता नसल्याने मोदी यांच्याकडून महाराष्ट्राची उपेक्षा सुरू आहे. ती अन्यायकारक आहे. ती उपेक्षा थोड्याबहूत प्रमाणात थांबेल.
Copyright © 2024 lokshahiaghadi.com . 
Developed by Highclonoid softec.  
Powered By Siddhant Media.