मुंबई, दि. ९ एप्रिल : राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्या झपाट्याने वाढते आहे. अशावेळी रुग्णालयात बेडस् आणि ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील ऑक्सिजनचे उत्पादन करणार्या कंपन्यांनी आता फक्त वैद्यकीय गजरेसाठीच ऑक्सिजन उप्तादन करावे, असे आदेश देण्यात आले आहेत. राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी ही माहिती दिली.
राज्यात सध्या 80 टक्के ऑक्सिजन हा वैद्यकीय वापरासाठी तर 20 टक्के हा उद्योगांसाठी देण्याचे आदेश कंपन्यांना दिले होते; पण त्यात आता लवकरच बदल केले जाणार आहे. आता शंभर टक्के ऑक्सिजन हा फक्त वैद्यकीय वापरासाठी देण्याचे आदेश कंपन्यांना दिले जाणार असल्याचे सांगून ते म्हणाले, की ऑक्सिजनच्या निर्मितीला वेळ आणि मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर लागते. येत्या काळात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अन्य राज्यातून ऑक्सिजन मिळवण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे विविध उद्योगांना केला जाणारा ऑक्सिजन पुरवठा आता थांबवला जाणार आहे. फक्त वैद्यकीय गरजेसाठीच ऑक्सिजन उत्पादन केले जाणार आहे. शिंगणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्य काही दिवसांत राज्यात काही भागात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. राज्यात ऑक्सिजन उत्पादन करणार्या अने कंपन्या असल्या तरी सात-आठ कंपन्यांमध्येच मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचे उत्पादन घेतले जाते. त्या कंपन्यांना टँकर्स आणि वाहतुकीबाबत सर्व मदत सरकारकडून दिली जात आहे. राज्यात 12 हजार 87 टन ऑक्सिजनचे उप्तादन घेतले जाते. आता रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे ऑक्सिजनची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशावेळी मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगडमधून ऑक्सिजन मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
राज्यात सध्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू आहे. तो रोखण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि शिंगणे यांनी इंजेक्शन निर्मिती कंपन्यांसोबत नुकतीच बैठक घेतली. त्यात रेमडेसिव्हीरचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथक आणि काळा बाजार होऊ नये, म्हणून इंजेक्शनची किरकोळ विक्री किंमत कमी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Copyright © 2024 lokshahiaghadi.com . 
Developed by Highclonoid softec.  
Powered By Siddhant Media.