All News

कमकुवत नेतृत्वामुळे देशाचे नुकसान

कमकुवत नेतृत्वामुळे देशाचे नुकसान

  • डॉ. राजन यांची टीका; गाफील राहिल्याने कोरोनाचा कहर

नवी दिल्ली, दि.४ मे : दुसर्‍या लाटेबाबत गाफील राहिल्यानेच कोरोनाने देशात कहर केला आहे. दररोजची प्रचंड रुग्णसंख्या सरकारी यंत्रणांच्या कोरोनाबाबतचा बेजबाबदारपणाची साक्ष देत आहेत. सरकारमधील कमकुवत नेतृत्व आणि दूरदृष्टीचा अभाव याचा परिपाक म्हणून कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने देशात मोठे नुकसान केले असल्याची घणाघाती टीका रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी केंद्र सरकारवर केली.


कोरोनाच्या दुसर्‍या लाटेबाबत सरकार आधीपासूनच सतर्क राहीले असते, तर त्यांनी तसे नियोजन केले असते. सरकारमधील कोणी जर जगाकडे लक्ष दिले असते, की इतरत्र कोरोनाची काय परिस्थी आहे, तर कदाचित भारतात इतकी वाईट परिस्थिती ओढवली नसती, असे डॉ. राजन यांनी म्हटले आहे. उदाहरण द्यायचे तर ब्राझीलमधल्या परिस्थितीतून बोध घेऊन सरकारने आणखी तयारीनिशी सज्ज रहाणे आवश्यक होते, असे त्यांनी म्हटले आहे. केंद्रातील अनेक बड्या अधिकार्‍यांनी भारताने कोरोनाविरोधातील लढाई जिंकली, कोरोनाला भारताने हरवले, अशा प्रकारच्या घोषणा यापूर्वीच केल्या होत्या; मात्र प्रत्यक्षात मार्च आणि एप्रिल महिन्यात कोरोनाने पुन्हा शिरकाव केला, असे राजन यांनी नमूद केले आहे.


पहिल्या लाटेवर नियंत्रण मिळवल्यावर सरकारी यंत्रणा आत्मसंतुष्ट बनली आणि तिथेच घात झाला. गेल्या वर्षी पहिल्या लाटेत दैनंदिन रुग्णसंख्या एका लाखांवर गेली नव्हती; मात्र यावेळी त्यात तीनपटीने वाढ झाली आहे. सलग 13 दिवस देशातील दैनंदिन रुग्णसंख्या सरासरी तीन लाखांच्या पुढे आहे. त्यावरदेखील डॉ. राजन यांनी टीका केली आहे. तसेच देशात लसीकरण मोहिमेतील गोंधळदेखील कोरोनाची साथ वाढण्यास कारणीभूत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. लसीकरण मोहिमेत निर्माण झालेल्या अडथळ्यांनी कोरोनाची दुसरी लाट आणखी घातक बनली असल्याचे राजन यांनी म्हटले आहे.


आजच्या घडीला भारतात कोरोनाचा मृत्यूदर सर्वाधिक आहे. जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत कोरोनाच्या दुसर्‍या लाटेते 3400 भारतीयांचा मृत्यू झाला आहे. कोरोना संकटाची वाढती तीव्रता पाहता अनेक औद्योगिक संघटनानी देशव्यापी टाळेबंदीची मागणी सरकारकडे केली आहे. एप्रिलच्या दुसर्‍या आठवड्यापासून प्रमुख राज्यांमध्ये कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने अक्षरशः कहर केला आहे. राज्यांना ऑक्सिजन, रेमडेसिव्हिर औषधे, व्हेंटीलेटर्स, बेड यासारख्या वैधकीय साधन सामुग्रीचा प्रचंड तुटवडा भासू लागला. ऑक्सिजनअभावी शेकडो रुग्णांना प्राण गमवावे लागले होते. देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने थैमान घातले असताना पाच राज्यांमध्ये निवडणुकीची प्रक्रिया सुरू होती.


आंतरराष्ट्रीय माध्यमातूनही मोदींवर टीका

कोरोनाची दुसरी लाट हाताळण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जगभरातून टीका सुरू झाली आहे. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आदी देशांतील मान्यवर वृत्तपत्रांनी भारतातील कोरोनाची परिस्थिती, दररोज होणारे मृत्यू आणि कोरोनाबाधितांवर उपचारात होणारी हलगर्जी यांच्यावर टीका केली आहे. 


Advertisement

Highclonoid Softec Pvt Ltd IBPS IBPS Highclonoid Softec Pvt Ltd