मुंबई, दि. १८ जुन : कोरोनाची दुसरी लाट अद्यापही संपलेली नाही; मात्र इतक्यातच आता नव्या संकटाची चाहूल लागली आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोनासाठी तयार करण्यात आलेल्या ’टास्क फोर्स’ने, गेल्या तीन दिवसांपासून बाहेर गर्दी दिसून येत आहे, ते पाहता पुढच्या दोन ते चार आठवड्यांमध्येच कोरोनाची तिसरी लाट महाराष्ट्र आणि मुंबईवर आक्रमण करू शकते, असा इशारा दिला आहे. ही लाट लहान मुलांपेक्षाही निम्न मध्यम वयाच्या लोकांवर जास्त परिणाम करील, असे या ’टास्क फोर्स’ने म्हटले आहे. हा गट अद्याप या लाटेच्या तडाख्यात सापडला नाही.
कोरोनाच्या तिसर्या लाटेबाबत आढावा घेण्यासाठी बैठक झाली. यात कोरोनाचा डेल्टा प्लस म्हणजेच वाय 1 व्हेरिएंटमुळे राज्यात तिसरी लाट येण्याचा धोका मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आला आहे. तिसर्या लाटेचा धोका पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ डॉक्टर आणि अधिकार्यांना औषध आणि आरोग्य उपकरण तयार ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. या वेळी मुख्यमंत्र्यांनी ग्रामीण भागात औषधांचा साठा करणे आणि आरोग्य सुविधा पुरवण्यावर जोर दिला. राज्याच्या आरोग्य विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले, की दुसर्या लाटेत ’डेल्टा वेरिएंट’मुळे रुग्णांची संख्या वाढली होती. आता तिसर्या लाटेत ही संख्या अजून वाढू शकते. कोरोनाच्या पहिल्या लाटेत 19 लाख आणि दुसर्या लाटेत जवळपास 40 लाख रुग्णांची नोंद झाली. अधिकार्यांनी सांगितल्यानुसार, तिसर्या लाटेत आठ लाख अॅक्टिव्ह रुग्ण असू शकतात. त्यातील दहा टक्के लहान मुले असतील.
मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या संभाव्य तिसर्या लाटेचा आढावा घेण्यासाठी ही विशेष बैठक बोलावली होती. या वेळी मुख्यमंत्र्यांनी मोठ्या प्रमाणावर सीरो सर्वे करण्याचे निर्देश दिले आहेत. या वेळी त्यांनी मागच्या लाटेतून धडा घेण्यावर जोर दिला. सध्याच्या आकडेवारीनुसार, तिसर्या लाटेमध्ये एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही दुसर्या लाटेच्या तुलनेत दुप्पट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ’टास्क फोर्स’चे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी म्हटले, की दुसर्या लाटेचा धोका कमी झाल्यानंतरच्या चार आठवड्यांतच ब्रिटनला तिसर्या लाटेला सामना करावा लागतो आहे. जर आपण सावध राहिलो नाही आणि कोरोना टाळण्यासाठीचे नियम पाळले गेले नाहीत तर आपणदेखील त्याच परिस्थितीला सामोरे जाऊ शकतो.
नियमांची पायमल्ली चिंताजनक
गेल्या दोन आठवड्यांदरम्यान राज्य सरकारने आठवड्याचा पॉझीटीव्हीटी दर आणि ऑक्सिजन बेड्सच्या उपलब्धतेनुसार पाचस्तरिय अनलॉकची प्रक्रिया लागू केली आहे. सध्याच्या या प्रक्रियेनुसार, 15 हून अधिक जिल्हे आणि नागपूर', नाशिक आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये सूट दिली गेली आहे. या दरम्यान, अनियंत्रित गर्दी, कोरोनाच्या नियमांची पायमल्ली करणे, सध्या चिंतेचे कारण मानले जात आहे.
Copyright © 2024 lokshahiaghadi.com . 
Developed by Highclonoid softec.  
Powered By Siddhant Media.