मुंबई, दि. 28 जून : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या ईडीच्या रडारवर असून त्यांच्या निवासस्थानी ईडीने धाड टाकल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. देशमुख यांच्या घरावर टाकलेल्या धाडीमुळे सरकार अडचणीत आले असतानाच आता शिवसेनेच्या नेत्यांची धाकधूक वाढली आहे.
सचिन वाझे याने आपल्या पत्रात परिवहन मंत्री अनिल परब यांचादेखील उल्लेख केल्यामुळे आधीच ते अडचणीत आहेत. त्यामुळे देशमुख यांच्यानंतर आपला तर नंबर लागणार नाही याची चिंता आता ईडीच्या रडारवर असलेल्या शवसेनेच्या नेत्यांना वाटू लागली आहे. पीएमसी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी काही महिन्यापूर्वी ’ईडी’ने खासदार संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना नोटीस बजावली होती. त्यानंतर राऊत यांनी लागलीच पत्रकार परिषद घेत थेट विरोधकांना राजकीयदृष्ट्या संपवता येत नसल्याने ईडी, सीबीआयसारख्या यंत्रणांचा वापर केला जात असल्याचे म्हटले होते.
आता राज्यात पुन्हा ईडी सक्रिय झाल्याने पुन्हा एकदा त्यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. एवढेच नाही, तर राऊत यांनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे, तर दुसरीकडे परब तसेच आधीपासून ईडीच्या रडारवर असलेले प्रताप सरनाईक हेदेखील सध्या ईडीच्या कारवाईमुळे चिंतेत आहेत. भविष्यात शिवसेनेचे आणखी नेते ईडीच्या रडारवर येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
Copyright © 2024 lokshahiaghadi.com . 
Developed by Highclonoid softec.  
Powered By Siddhant Media.