मुंबई, दि. १३ मे : कोरोनाचा संसर्ग वाढू नये आणि आपल्याला लागण होऊ नये यासाठी मुखपट्टी घालण्याची सूचना वारंवार केली जात असते; पण तरीही काही महाभाग हे मुखपट्टी न वापरता फिरत असतात. मुंबईत गेल्या वर्षभरात तब्बल 54 कोटींचा दंड अशा महाभागांकडून वसूल करण्यात आला आहे, तर पुण्यात 17 कोटी 85 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
मुंबई आणि पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून कडक कारवाई केली जाते. सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टी घालणे बंधनकारक करण्यात आले आहे; पण असे असले, तरी काही लोक मुखपट्टी वापरत नाहीत. अशा लोकांकडून महापालिकांनी ’क्लीन अप मार्शल’ मार्फत दंड गोळा केला आहे. मुंबई महापालिकेकडून संपूर्ण वर्षभरात मुखपट्टी न घालणार्यांच्या विरोधात केलेल्या कार्यवाहीत 54 कोटी रुपये गोळा केले आहेत. मुंबईत मुखपट्टी न वापरणार्या विरोधात 200 रुपये दंडाची कारवाई केली जाते. ’क्लीन अप मार्शल’मार्फत ही कारवाई केली जाते. आता पोलिस कर्मचार्यांना ही कारवाई करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. मुंबईत रेल्वेत, शहर परिसरात ’क्लीन अप मार्शल’ आणि पोलिसांमार्फत कारवाई होते. तिन्ही रेल्वे लाईनवर प्रत्येकी 100 या प्रमाणे 300 मार्शल लावण्यात आले आहेत.
पुणे पोलिसांनी वर्षभरात मुखपट्टी न घालणार्या तब्बल तीन लाख 54 हजार 969 पुणेकरांवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्यांच्याकडून 17 कोटी 85 लाख रुपयांचा दंड केला वसूल केला आहे. शहरात दररोज मुखपट्टीविना फिरणारे किमान दोन ते तीन हजार नागरिक पोलिसांना दिसत असून पोलिसांकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. एकंदरीत मुंबई आणि पुणे शहरात गेल्या वर्षभरात मुखपट्टी न वापरणार्यांवर करण्यात आलेल्या कारवाईवरून कुठल्या शहरात किती बेफिकीर लोक आहेत, याचा अंदाज दंडाच्या रक्कमेवरून येतो आहे. मुंबईच्या तुलनेत पुण्यात दंड वसुलीही दुप्पटीने कमी आहे. याचाच असा अर्थ असाही होतो, की पुण्यात मुखपट्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. मुंबईत मात्र बेफिकीर लोकांची कमी नाही, असे दिसते.
Copyright © 2024 lokshahiaghadi.com . 
Developed by Highclonoid softec.  
Powered By Siddhant Media.