मुंबई, दि. २१ मे : प्रचंड वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे अवघ्या काही तासांतच मुंबईची त्रेधातिरपीट उडाली. अशाही स्थितीत योग्य नियोजन आणि आवश्यक ती खबरदारी घेतल्याने शहरातील मेट्रोची कामे सुरू राहिली. शेवटच्या टप्प्यात आलेल्या मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7चे काम वेगाने सुरू असून नियोजित वेळेत अर्थात मे अखेरपर्यंत या मार्गावर चाचणी होईल, असा विश्वास मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) व्यक्त केला आहे.
तौत्के चक्रीवादळाने रस्ते, रेल्वे आणि हवाई सेवेवर निर्बंध आणले. सोसाट्याच्या वार्यामुळे कित्येक पावसाळे पाहिलेले डेरेदार वृक्षही कोसळले. बॅनर-होर्डिंग पडल्याने रेल्वेसेवा ठप्प झाली. अशा स्थितीत मेट्रो कामांवर मात्र कोणताही परिणाम झाला नाही. अजस्त्र क्रेन, वार्याने उडू शकणारी साधने सुरक्षित स्थळी नेल्याने मेट्रो कामांच्या स्थळी कोणतेही नुकसान झाले नाही, असे एमएमआरडीएच्या प्रवक्त्यांनी सांगितले. कोरोना काळातील अधिक कडक निर्बंध, मजूर गावी गेल्याने आणि चक्रीवादळाचा तडाख्याने अनेक अडचणी आल्या. त्यावर नियोजन आणि काटेकोर अंमलबजावणीने यशस्वी मात करण्यात आली आहे.
दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व (मेट्रो 2 अ) आणि दहिसर ते डीएन नगर (मेट्रो 7) या मार्गावरील ओएचई तपासणीसह अन्य कामे शेवटच्या टप्प्यात आहेत. पहिल्या टप्प्यात 20 किलोमीटरवर मेट्रो चाचणी होईल. मेट्रोच्या दोन्ही मार्गांची एकूण लांबी 35 किलोमीटर आहे. मुंबई महानगर प्रदेशात 300 किलोमीटर लांबीच्या मेट्रो प्रकल्पांचे काम सुरू आहे. चक्रीवादळ आणि त्यानंतर आलेल्या पावसामुळे मुंबईतील बर्याच भागांत पाणी साचले. या पाण्याचा निचरा जलदगतीने होण्यासाठी निचरा रोखणारे अनेक अडथळे एमएमआरडीएकडून हटविण्यात आले. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि एमएमआरमध्ये मुंबई शहरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत हाती घेण्यात आलेल्या कामांवर चक्रीवादळाचा विशेष परिणाम झालेला नाही. वादळामुळे कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. कोरोना निर्बंधाचे अत्यंत काटेकोरपणे पालन करून ही कामे करण्यात येत आहेत, असेही एमएमआरडीएकडून सांगण्यात आले.
Copyright © 2024 lokshahiaghadi.com . 
Developed by Highclonoid softec.  
Powered By Siddhant Media.