मालेगावातील पश्चिम भागासह ग्रामीण भागात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे.
मालेगाव : दि ०९ ऑगस्ट : मालेगावातील पश्चिम भागासह ग्रामीण भागात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. मालेगाव पॅटर्न ठरत असलेल्या शहरातील वाढती रुग्ण संख्या रोखण्यासाठी प्रशासनासह सर्व नागरिकांनी सतर्क राहून आरोग्य प्रशासनाचे नियम पाळावेत. आरोग्य प्रशासनाने दिलेले नियम न पाळल्यास व रुग्णसंख्या वाढल्यास शहरातील पश्चिम भागासह ग्रामीण भागातील वडेल व झोडगे भागात दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज सांगितले.मालेगाव शहरासह ग्रामीण भागात गेल्या आठवड्यात कोरोनाची वाढत्या रुग्णसंख्येच्या अनुषंगाने आज शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी मंत्री श्री.भुसे बोलत होते. यावेळी घटना व्यवस्थापक तथा अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, तहसिलदार चंद्रजित राजपूत, महानगरपालिकेचे उपायुक्त नितीन कापडणीस, गट विकास अधिकारी जितेंद्र देवरे, पोलीस उपअधिक्षक शशिकांत शिंदे, डॉ.हितेश महाले, डॉ.सपना ठाकरे, तालुका आरोग्य अधिकारी शैलेश निकम यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलतांना मंत्री श्री.भुसे म्हणाले, मालेगावातील वाढत्या रुग्णसंख्येमध्ये बहुतांश रुग्ण हे शहरातील पश्चिम भागासह ग्रामीण भागातील आहेत. त्यांच्यासाठी एम.एस.जी.कॉलेजमधील कोवीड सेंटर कार्यान्वित ठेवण्यात यावे. ॲन्टीबायोटीक औषधांचा तुटवडा भासणार नाही यासाठी महापालिकेने तात्काळ उपाययोजना कराव्यात. रुग्णांना गृहविलगीकरणाची मुभा देतांना त्यांना आरोग्य प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.पुढे बोलतांना श्री.भुसे म्हणाले, मानवतावादी दृष्टीकोनातून कुठल्याही रुग्णावर उपचार झाला पाहिजे, यात शहरी, ग्रामीण रुग्णांवर उपचार करणे ही आपली जबाबदारी आहे. महानगरपालिकेला उपलब्ध करुन दिलेल्या निधीतून तात्काळ औषधी उपलब्ध करून द्यावी. यासाठी लागणारा पुरेसा निधी उपलब्ध करून दिला असून आवश्यकता भासल्यास निधी उपलब्ध करून दिला जाईल. उपचाराशिवाय एकही रुग्ण वंचित राहता कामा नये असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. त्याच बरोबर शहरातील रस्त्यालगत असलेल्या विक्रेत्यांनी विशेष काळजी घेवून दिलेल्या सुचनांचे पालन करावे. नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये, नियमीत मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हातांचे निर्जंतुकीकरण करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.यावेळी शहरासह ग्रामीण भागातील आरोग्य अधिकाऱ्यांकडून औषधसाठ्यासह उपलब्ध मनुष्यबळाचा आढावा घेतला. तर अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, उपायुक्त नितीन कापडणीस व डॉ.हितेश महाले यांनी तालुक्यातील आरोग्य प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांचे सादरीकरण केले.