मनोज सोनी यांनी पंधरवड्यापूर्वी अध्यक्षपदाचा राजीनामा सुपूर्द केला होता, तर वरिष्ठांनी अद्याप राजीनामा स्वीकारलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दिल्ली, दि. २० : केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (यूपीएससी) अध्यक्ष मनोज सोनी यांनी आपला कार्यकाळ संपण्याच्या पाच वर्षे आधीच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सोनी यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे की, वैयक्तिक कारणास्तव आपण पदाचा राजीनामा देत आहेत. मनोज सोनी यांनी पंधरवड्यापूर्वी अध्यक्षपदाचा राजीनामा सुपूर्द केला होता, तर वरिष्ठांनी अद्याप राजीनामा स्वीकारलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरण समोर आल्यानंतर संघ लोकसेवा आयोगाशी (यूपीएससी) वाद आणि आरोपांशी त्यांच्या राजीनाम्याचा कोणत्याही प्रकारे संबंध नाही. सोनी यांनी १६ मे २०२३ रोजी यूपीएससीच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली होती आणि त्यांचा कार्यकाळ १५ मे २०२९ रोजी संपणार होता. कार्यकाळ संपण्याच्या पाच वर्ष आधीच त्यांनी राजीनामा दिला आहे. प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबियांवर यूपीएससीने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी अधिक प्रयत्न करण्यासाठी नावे व माहिती बदलून परीक्षा दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. नोकरशहा म्हणून सत्तेचा आणि विशेषाधिकारांचा गैरवापर केल्याप्रकरणी प्रशिक्षण पूर्ण करण्यापूर्वीच खेडकर यांची पुण्याबाहेर बदली झाल्यानंतर त्या चर्चेत आल्या होत्या. आयोगाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली असली तरी ते पद स्वीकारण्यास इच्छुक नसून त्यांना कार्यमुक्त करायचे आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र, त्यावेळी त्यांची विनंती मान्य करण्यात आली नाही. सोनी यांनी आता सामाजिक-धार्मिक उपक्रमांसाठी अधिक वेळ देण्याची इच्छा व्यक्त केली आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. यूपीएससीचे सदस्य म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी सोनी यांनी विविध विद्यापीठांचे कुलगुरू म्हणून तीन वेळा काम केले. एप्रिल २००५ ते एप्रिल २००८ या कालावधीत बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठात कुलगुरू पदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा ते भारतातील सर्वात तरुण कुलगुरू होते. पूजा खेडकर यांचे फसवणुकीचे प्रकरण समोर आल्यानंतर अनेक बोगस आयएएस अधिकाऱ्यांची प्रकरणे समोर येऊ लागली आहेत. ओबीसी आणि आर्थिक मागास प्रवर्गाचा फायदा घेऊन काहींनी यूपीएससी परीक्षेत लाभ मिळविल्याचा आरोप करण्यात आला. तसेच काही अधिकाऱ्यांनी खोटे अंपगत्वाचे प्रमाणपत्र देऊन यूपीएससीची दिशाभूल केली असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे यूपीएससीच्या विश्वासाहर्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. त्यातच अध्यक्षांनी राजीनामा दिल्याचे प्रकरण समोर आल्याने चर्चांना उधाण आले.