विवेकानंदांनी भगवद्गीतेसंबंधी व्यक्त केलेल्या मतांपैकी काही मते या लेखात मांडली आहेत.
भगवद्गीता हा स्वामी विवेकानंदांचा आवडता ग्रंथ होता. संन्यासी या नात्याने विवेकानंदांनी सन १८८८ मध्ये भारत भ्रमणास सुरुवात केली. १८८८ ते १८९३ या कालावधीत ते भारताच्या अनेक राज्यात फिरले. देशाच्या बहुतांश भागात ते गेले . त्या काळात त्यांच्या सोबत एक कमंडलू आणि दोन पुस्तके यांच्याशिवाय काहीही नव्हतं ! स्वामी विवेकानंदांजवळ असलेल्या त्या दोन पुस्तकांपैकी एक पुस्तक होतं ' इमिटेशन ऑफ द ख्राईस्ट ' आणि दुसरं पुस्तक होतं ' भ गवद्गीता '. स्वामी विवेकानंदांनी भगवद्गीते संबंधी आपली मतं अनेकदा व्यक्त केली आहेत. विवेकानंदांनी भगवद्गीतेसंबंधी व्यक्त केलेल्या मतांपैकी काही मते या लेखात मांडली आहेत. ही मते कोणती आहेत ते पाहूया शुक्रवार, दिनांक २५ डिसेंबरच्या गीता जयंतीच्या निमित्ताने !************************************भगवद्गीतेतून भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जो काही उपदेश केला आहे त्याची सुरुवात होते दुसऱ्या अध्यायातील दुसऱ्या श्लोकापासून.स्वामी विवेकानंद म्हणतात ---१) भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला केलेल्या उपदेशाची सुरुवात होते तीच मुळी एका अत्यंत अर्थपूर्ण अशा श्लोकाने ! त्या श्लोकात श्रीकृष्ण म्हणतात -- हे अर्जुना,या भलत्याच वेळी हा मोह तुला कशामुळे उत्पन्न झाला ? थोर व्यक्तींनी मोहाचा अंगीकार कधीही केला नाही.कारण हा मोह स्वर्गही मिळवून देत नाही आणि किर्तीही मिळवून देत नाही. २) आत्म्याचे ज्ञान करून देणे हे भगवद्गीतेचे सर्वोच्च उद्दिष्ट आहे.३) गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला तिसरा श्लोक तुम्ही जरूर वाचा . हा श्लोक आहे --क्लैब्यं मा स्म गम: पार्थ नैतत्वय्युपपद्यते ।क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप ।।( या श्लोकाचा अर्थ आहे-- हे अर्जुना,षंढपणा पत्करू नकोस.असा षंढपणा पत्करणे तुला शोभत नाही.हे परंतपा, अंत:करणाचा दुबळेपणा सोडून दे आणि युद्धाला उभा राहा.)हा श्लोक वाचून पूर्ण गीता वाचल्याचं समाधान मिळतं . या एकाच श्लोकात गीतेचं संपूर्ण सार सामावलेलं आहे.४) भगवद्गीतेचा अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला कृष्ण समजणार नाही . कारण तो स्वतःच गीतेत सांगितलेल्या शिकवणुकीचं आचरण करतो. म्हणून अगोदर गीता वाचा. म्हणजे मग श्रीकृष्ण तुम्हाला समजेल.५) परिस्थिती कशीही असो, त्या परिस्थितीमध्ये शांत आणि खंबीर राहा अशी गीतेची मध्यवर्ती कल्पना आहे . आपलं शरीर, मन आणि आत्मा भगवान श्रीकृष्णाच्या पवित्र पायावर अर्पण करा . थोडक्यात सांगायचं तर भगवान श्रीकृष्णाला शरण जा !६) रात्रंदिवस फक्त कर्म , कर्म आणि कर्मच करीत राहा असं भगवद्गीता सांगते.७) मेणबत्तीच्या किंवा दिव्याच्या प्रकाशात आपण जेव्हा भगवद्गीता वाचत असतो तेव्हा अनेक कीटक मधेमधे येतात.मेणबत्तीच्या किंवा दिव्याच्या प्रकाशात ते मरतातही ! याचाच अर्थ असा की, तुम्ही कोणतंही चांगलं काम हाती घेतलं की काही दुष्ट प्रवृत्तीचे लोक त्यात अडथळे आणतात. आपला अहंपणा किंवा दुराभिमान बाजूला ठेवून जे लोक चांगलं काम करतात त्यांना कोणत्याही दुष्ट शक्ती त्या कामापासून विचलित करू शकत नाहीत . कारण ते काम असतं जगाच्या कल्याणासाठी ! कोणताही हेतू मनात न ठेवता किंवा कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता नि:स्पृहपणे काम करण्याने परमानंद प्राप्त होत असतो. हा कर्मयोग भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेतून शिकविला आहे.८) मानवजातीच्या इतिहासाच्या सुरुवातीच्या काळापासून युद्धाचे हिसके आपल्याला बसले आहेत . श्रुतींमध्ये युद्धाचे दुष्परिणाम स्पष्टपणे दाखविले आहेत. एक लहानसा काळ असा आला होता की त्या काळात श्रीकृष्णाने समेटाचा आणि शांततेचा मार्ग दाखविला.कृष्णाने दाखविलेल्या त्या मार्गामुळे क्षत्रियांच्या शक्तीत आणि ज्ञानात फाटाफूट झाली.परिणामी तत्वज्ञानाचा,औदार्याचा आणि धर्माचा मतितार्थ असलेली गीतेची शिकवण आपल्याला मिळाली.९) गीतेने परोपकाराचे तीन प्रकार सांगितले आहेत. ते प्रकार आहेत -- तामसिक, राजसिक आणि सात्विक. तामसिक परोपकार हा अनिच्छेने केला जातो. तो कोणाच्यातरी सक्तीमुळे केला जातो. अशा परोपकारात नेहमी चुका होतात. कारण तामसिक परोपकार करणारी व्यक्ती कोणताच विचार न करता परोपकार करत असते . स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी किंवा प्रसिद्धी मिळविण्यासाठी जो परोपकार केला जातो तो असतो राजसिक प्रकारचा परोपकार . सात्विक परोपकार हा योग्य व्यक्तीवर, योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी केला जातो.१०) भौतिकता दूर केल्याशिवाय अध्यात्मिकता कधीच प्राप्त होऊ शकत नाही. निसर्गातल्या गोष्टींचं ज्ञान आणि निसर्गाची शिकवण ही फक्त वेदच देऊ शकतात. ११) भगवद्गीता ही वेदांताच्या तत्त्वज्ञानावरची श्रेष्ठ टिप्पणी आहे .रणांगणावर श्रीकृष्ण वेदांताचं तत्वज्ञान अर्जुनाला शिकवितो. गीतेच्या प्रत्येक पानावर आपल्याला ही शिकवण ठळकपणे दिसून येते.१२) तुम्ही जेवढं कमी वाचाल तेवढं चांगलं !गीता वाचा आणि वेदान्तावरचे उत्तम ग्रंथ वाचा. तुम्हाला त्याचीच गरज आहे. सध्याची शिक्षण पद्धती चुकीची आहे. विचार कसा करावा हे जाणून घेण्यापूर्वीच मेंदूमध्ये अनेक गोष्टी कोंबल्या जातात . मेंदूवर नियंत्रण कसे ठेवावे हे अगोदर शिकविले गेले पाहिजे. मला जर पुन्हा शिकण्याची संधी मिळाली आणि एखाद्या गोष्टीवर बोलण्याची संधी मिळाली तर मी प्रथम मेंदूवर ताबा कसा मिळवावा ते शिकेन. त्यानंतर जर मला काही गोष्टींची गरज भासलीच तर मी त्या गोळा करेन. इच्छेप्रमाणे मनाला नियंत्रणात ठेवता न आल्याने लोकांना एखाद्या गोष्टीचं ज्ञान किंवा एखाद्या गोष्टीचं आकलन होण्यास बराच वेळ लागतो.१३) गीता हे उपनिषदांवरचं भाष्य आहे. उपनिषदे ही ' भारताचं बायबल 'आहे.ख्रिश्चन धर्मात ' न्यू टेस्टामेंट ' ( नवा करार ) चं जे स्थान आहे तसंच स्थान उपनिषदांचं हिंदू धर्मात आहे .१४) गीता हे वेदांचं सार आहे .गीता हे आमचं बायबल नाही. आमचं बायबल आहे उपनिषदे ! गीता हे उपनिषदांचं सार आहे आणि गीतेने उपनिषदांमधल्या अनेक विरोधाभासी भागांचा मेळ घडवून आणला आहे.१५) गीता आपल्याला शिकविते लहान गोष्टींमधली महानता !१६) धर्माच्या वेगवेगळ्या मार्गांचा समेट आणि कोणत्याही फळाची अपेक्षा न करता कर्म करणे किंवा नि:स्पृहपणे कर्म करणे ही आहेत गीतेची दोन खास वैशिष्ट्ये !१७) गीतेने शिकविलेली कृष्णाची शिकवण ही जगाला मिळालेली एक मोठी देणगी आहे. ज्यानं हे अद्भुत काव्य लिहिलं आहे तो दुर्मिळ आत्म्यांपैकी एक आत्मा आहे. त्याच्यासारखा मेंदू मानवजात पुन्हा कधीच पाहू शकणार नाही.१८) दिवसातून जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा भगवद्गीता अगदी जरूर वाचा.संजय पाठकमालेगाव कॅम्प९४२०० ७७१५०( लेखक हे मालेगावच्या विवेकानंद केंद्राचे आणि विवेकानंद विचारदूत योजनेचे कार्यकर्ते आहेत.)