IMG-LOGO
मंथन

सावरकर सिनेमा पहावाच कारण..!

Monday, Apr 01
IMG

मराठीतला एक बॉक्स ऑफिसवर नेहमी होणारा यशस्वी दिग्दर्शकाने सावरकरांच्या सिनेमात मुख्य भूमिकेसाठी हुडाला निमंत्रित केले.

नुकताच दिनांक २२ मार्च २०२४ ला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ सिनेमा प्रदर्शित झाला. रणदीप हुडा नावाचा वेगळ्या भूमिका साकारणारा हिंदीतील नट, पहिल्यांदाच स्वातंत्र्य वीर सावरकरांचे जीवन चरित्र व तत्वज्ञान मांडण्याचा प्रयत्न करतोय! आणि सांगण्यास अत्यंत आनंद होतो की तो पूर्णपणे यशस्वी झालाय! त्याचे  शतशत धन्यवाद! मनापासून अभिनंदन!२०२२ मध्ये स्वतंत्रपणे सावरकरांच्या सिनेमाचे शिवधनुष्य पूर्णतः आपल्या खांद्यावर घेतो! आणि आता  ९०० चित्रपटगृहात एकाच वेळी सिनेमाचे प्रदर्शन करतो.  प्रदर्शन पूर्व जाहिरातीची जबाबदारीही स्वतः एकटाच उचलतो!कोण हा रणदीप हुडा ? मराठी नाव तर वाटत नाही. हा हरियाणाचा एका खेड्यातील ,सिनेमाची कोणतीही पार्श्वभूमी नसणारा  तरुण जाट! उच्चविद्याभुषित कुटुंबात जन्मलेला व परदेशात शिक्षण घेतलेला रणदीप!याचा सावरकरांशी काय संबंध! तुम्हाला असे नक्कीच वाटेल! मराठीतला एक बॉक्स ऑफिसवर नेहमी होणारा यशस्वी दिग्दर्शकाने सावरकरांच्या सिनेमात मुख्य भूमिकेसाठी हुडाला निमंत्रित केले. त्यांनी केलेली पटकथा पाहून रणदीप अस्वस्थ झाला. रणदीपनेच स्वतः अभ्यास केला. स्वतः कथा पटकथा लेखन मध्ये महत्त्वाचा सहभाग घेऊन प्रथमच दिग्दर्शनासह मुख्य भूमिका करून ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’बोलपट साकारला. एवढेच नाही तर पैशाची गरज निर्माण झाली तेव्हा स्वतःचे घर गहाण ठेवून, विकून सिनेमा पूर्ण केला. व स्वतः जाहिरात करून आपणांसमोर ठेवला आहे.मराठी सिनेसृष्टीत सृजनशील, बुद्धिवान व प्रयोग करणाऱ्या दिग्दर्शकांची उणीव नाही. विश्राम बेडेकर,राजा परांजपे, भालजी पेंढारकर ,व्ही शांताराम सारखी मंडळी मराठी सिनेसृष्टीत होऊन गेली आहेत. इतिहास तयार करणाऱ्या दिग्दर्शकांनी जे काही दीपस्तंभ उभारून ठेवले आहेत. त्यामागे सत्तेच्या पन्हाळीचे पाणी कधीच नव्हते. त्या पन्हाळीसमोर, त्यावेळच्या दिग्गजांनी अर्थजलासाठी लोटांगणही घातल्याचे ऐकीवात  नाही. स्वतंत्र बाणा व स्वाभिमान जपणारी ही माणसं! पण यांच्या काळानंतर मात्र मराठी दिग्दर्शक जे मराठी व हिंदीतही नावारूपास आले. त्यांनी महाराष्ट्राच्या मातीत असलेलं व रुजलेलं स्वाभिमान व धारिष्टय आपल्या सिनेक्षेत्रात दाखवलं नाही. दणादण धडाकेबाज सोबतच हळद कुंकू वाहिलेले नवसाचे नवरे आणि साडी पलीकडे मंडळी कधीच गेली  नाहीत. त्यांना भारतावर राज्य करणार्याु अकबर जोधावर भव्यदिव्य हिंदी सिनेमा काढावा वाटला! पण मराठी मातीत जन्म घेऊन विश्वपटलावर इंग्लंड फ्रान्स ते अंदमान पर्यंत आपल्या क्रांती कार्यकर्तृत्वाची गरुडझेप घेणाऱ्या स्वातंत्र्य सावरकरांच्या जीवन चरित्रावर सिनेमा काढण्याचे शिवधनुष्य पेलण्याची हिंमत झाली नाही. बॉक्स ऑफिस वर नजर ठेवणारे व लागेबांधे जपणारे  ह्या मराठी दिग्दर्शकांना आज  आचार्य अत्रे असते तर,अत्र्यांनी फटकेच मारले असते! याविषयी मुळीच शंका नाही. आणि मराठा मधून रणदीप हुडाच्या या बोलपटिय कर्तृत्वावर अग्रलेखाची मालिका आली असती. तेवीस वर्षांपूर्वीचा सुधीर फडके यांचा ‘सावरकर’तब्बल 23 वर्षांपूर्वी बाबूजी म्हणजे संगीतकार सुधीर फडके यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जीवन चरित्रपट आणण्याचे शिवधनुष्य पेलले होते. तब्बल दहा-बारा वर्षाचा कालखंड त्याला लागला. अनेक दोषारोप झाले. तेव्हाचे वातावरणही सावरकर विचार व तत्वज्ञानाला फार सुलभ सुखकर होते असे नाही. विश्राम बेडेकरांसारखे दिग्दर्शक बदलले, पटकथा बदलल्या, केलेल्या शूटिंग ची रिळे सावरकर चरित्रास न्याय देत नाहीत म्हणून ती टाकून दिलीत. सर्वसामान्य लोकांच्या पैशांचा दुरुपयोग होत आहे अशा आरोळ्या झाल्यात. पण बाबूजी सुधीर फडके डगमगले नाहीत हार मानली नाही! त्यांनी प्रतिज्ञा घेतली की ‘मी सावरकर बोलपट पूर्ण केल्याशिवाय मरणार नाही’.त्यांनी हिंदीतील अभ्यासू व प्रतिथयश पटकथा दिग्दर्शक श्री वेद प्रकाश राही यांना  निवडले आणि सावरकर बोलपट पूर्ण झाला,अन् प्रदर्शितही झाला. आणि बाबूजी गेले! बाबूजींचा काळ म्हणजे काँग्रेसच्या सत्तेवर असण्याचा कालखंड! सुधीर फडके यांनी आपले सावरकर प्रेम कधीही लपवले नाही कोणत्याही तडजोडी केल्या नाहीत!सावरकर ज्वलंत अग्निज्वालेचा गोळ आजही मराठी क्षेत्रात अनेक नामवंत प्रज्ञावान मंडळी आहेत जे सावरकरांना मानतात त्यांचे कार्य मानतात. पण महत्त्वाचे म्हणजे लोकांसमोर जगासमोर नाहीतर एकांतात! यास सन्माननीय अपवाद आहेत! स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाशी जे जे जोडल्या गेले, त्या त्या सर्वांना ह्या सतीच्या वाणाने रक्तबंबाळच केली आहे, आयुष्यभर महत्  कष्ट देऊन उपेक्षितच ठेवले आहे! हा  ज्वलंत अग्निज्वालेचा गोळ कोण तळहाती घेईल?पण हरियाणाच्या जाठ हिंदी अभिनेत्याने सतीचे वाण, अग्नीगोळ तळहातावर घेऊन संपूर्ण भारतीयांना, ‘होय मी सावरकर विचार मांडला आहे! सावरकर तत्त्वज्ञान मांडले आहे! कुणाचाही भिडभाड न ठेवता कुणालाही न घाबरता! ’ सुधीर फडके यांनी संयतपणे  कोणत्याही इतर विचारांना अपमानित केले नाही. पण सावरकर प्रखरपणे मांडले. इथे मात्र रणदीप हुडा कोणत्याही विचारांची तमा बाळगत नाही ,कुणाचे मन दुखावेल याची फिकिर करत नाहीत! आणि बिनधास्तपणे तन मन धनाने स्वतःला पूर्ण झोकून सिनेमा तयार करतो ! आणि एकटा शिलेदार संपूर्ण सिनेमाची जाहिरात करतो! म्हणून त्याचे त्रिवार अभिनंदन!परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेतलेला रणदीप नाट्य सिनेमाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेला, तरुण प्रथम नाटक करतो. नंतर अभिनय प्रशिक्षण, आणि मीरा नायर च्या २००१ मधल्या ‘मान्सून वेडिंग’ चित्रपटातून पदार्पण! बागी ,जन्नत टू वन्स अपॉन टाईम इन मुंबई   अशा सिनेमांतून यशस्वी, अयशस्वी सिनेमा करीत राहतो पण त्याच्यामधला कलावंत जपत. २०१५ चा फिल्मफेअर पुरस्कार मिळालेला चित्रपट रंगरसिया, ज्यामध्ये रणदीप ने राजा रविवर्मा याची सुंदर भूमिका केली होती. सावरकर इतर राज्य व महाराष्ट्रराजकीय, सांस्कृतिक व ऐतिहासिक दृष्ट्या इतर राज्य व महाराष्ट्र यांचा तुलनात्मक अभ्यास केल्यास इतर राज्याप्रमाणे दोन ध्रुवांचे ध्रुवीकरण महाराष्ट्रात कधीच झाले नाही. महाराष्ट्रात मात्र काँग्रेस ,हिंदुत्ववादी पक्ष, समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट पक्ष इत्यादी विविध विचारधारा व त्या विचारधारांना मानणारे कार्यकर्ते नेते महाराष्ट्रात निर्माण झाले.स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर कालखंड बघितला तर काँग्रेसची शासन असताना व त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे शासन असताना, जवळजवळ सर्वच राजकीय नेत्यांना मानाचे स्थान मिळाले. मग ते काँग्रेस नेते असो की गैर काँग्रेसी नेते! एकमेव सावरकरच असे आहेत ज्यांना अजूनही राज्यस्तरावर तसेच राष्ट्रस्तरावर यथोचित सन्मान मिळालेला नाही. डॉक्टर आंबेडकरांपासून चौधरी चरणसिंगापर्यंत सगळ्यांचा मानसन्मान झालेला आहे. उपेक्षित फक्त एकमेव स्वातंत्र्यवीर सावरकर. बालपणापासून तो आयुष्याच्या अंतापर्यंत त्यांनी जे जे कार्य केले ते ते त्या क्षेत्रात एकमेवाद्वितीयच ठरलेले आहे. मग ते बालपणीच्या स्वतंत्रता देवीच्या समोर घेतलेल्या प्रतिज्ञापासून , मित्रमेळा, अभिनव भारत, परदेशी कपड्यांची होळी, फर्ग्युसन कॉलेजचा दंडीत विद्यार्थी, इतिहास संशोधक, इतिहास निर्माता, मराठी कवी साहित्यिक, राष्ट्र -हिंदुत्व- स्वातंत्र्य यांचे विवेचन करणारा द्रष्टा, दोन जन्मठेपेची म्हणजे पन्नास वर्षाची शिक्षा झालेला आंतरराष्ट्रीय कैदी, महान वक्ता, समाज सुधारक, विज्ञानवादी, शस्त्र व शास्त्र यामध्ये पारंगत विचार असलेला, भाषाशुद्धीकार असं शतपैलू , नव्हे त्याही पेक्षा मोठे व्यक्तिमत्व  म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. दुर्दैवी महाराष्ट्रानेच पूर्णतः सावरकर यांना न स्वीकारल्याने देशापर्यंत त्यांचे कार्य कर्तृत्व गेले नाही. स्वातंत्र्यानंतर जे गेले ते महात्मा गांधीचे हत्येतील आठवे आरोपी म्हणून! माफी वीर म्हणून इंग्रजांची पेन्शन घेतली म्हणून! पूर्णतः खोटे काल्पनिक व इतरांना मोठे करण्यासाठी केलेल्या आरोपांची माळ आहे. रणदीपहुडाने तीन तासात सावरकरांचे बरेच पैलू दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर व काही मुख्य व्यक्तिरेखा वगळता तत्कालीन राजकीय नेत्यांचे व्यक्तिचित्रण फार सामान्य झाले आहे. त्यावेळचा काळ उभा करण्यास दिग्दर्शक यशस्वी झालेला असून इंग्रजी संवाद बऱ्याच प्रमाणात आहेत. पण सोबत तळटिप दिलेली आहे. सहा सोनेरी पाने व भाषा शुद्धिकार हे विषय घेतल्या गेले नाहीत. संगीत काठावरच्या गुणांनी पास झाले आहे. पण सावरकर विचार, तत्त्वज्ञान व सिनेमाचा वेग, अभिनय, दिग्दर्शकाची हाताळणी याकरीता हा सिनेमा अवश्य पहावाच!            खरं म्हणजे ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रचंड संशोधन व भरपूर खर्च करून नामवंत दिग्दर्शकाने, सावरकर चरित्राची मालिका काढायला हवी. तेव्हाच त्यांना त्यांच्यातील सर्व पैलूंना दिला जाऊ शकतो.संपूर्ण भारत देश तसेच जगात पसरलेले तरुण आज रोजी सावरकर तत्वज्ञान समजून घेत आहेत. राष्ट्रवाद, हिंदुत्व, राष्ट्राभिमानमान, स्वभाषाभिमान, शस्त्र व शास्त्राचा समन्वय हे सर्व समजून घेत आहेत! मी हा सिनेमा पाहिलाय! चला तुम्ही पण पहा! सावरकर विचार व तत्वज्ञानाची चळवळ या निमित्ताने उभी करू या! राष्ट्राच्या कसोटीवर आपले विचार घासून तपासून ताऊन सुलाखून घेऊया! रणजीत हुडाच्या या आगळ्यावेगळ्या कष्टाचे चीज करूया त्याला शुभेच्छा देऊ या! आणि सावरकर भारताचे प्रथम रत्न आहेत हे सिद्ध करूया!- हेमंत चोपडे, नाशिक७३५०७०५०९१

Share: