ऐन निवडणुकीत भाजपा शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या 19 उमेदवारांना मतदारांनी घरची वाट दाखविली आहे. दिलीप सोपल, जयदत्त क्षीरसागर यांच्यासारख्यांचा त्यात समावेश असून पाच विदयमान मंत्रीही या निवडणूकीत पराभूत झाले आहेत.
ऐन निवडणुकीत भाजपा शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या 19 उमेदवारांना मतदारांनी घरची वाट दाखविली आहे. दिलीप सोपल, जयदत्त क्षीरसागर यांच्यासारख्यांचा त्यात समावेश असून पाच विदयमान मंत्रीही या निवडणूकीत पराभूत झाले आहेत.सर्व राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या काही मतदारसंघाचे निकाल धक्कादायक लागले आहेत. भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या असलेल्या व विदयमान सरकारमध्ये मंत्रीपद भूषविलेल्या पंकजा मुंडे पालवे यांचा त्यांच्याच चुलतभावाने म्हणजेच राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या धनंजय मुंडे यांनी पराभव केला आहे. या दोघांमध्येही अटीतटीची लढत झाली होती. शेवटच्या टप्प्यात आरोप प्रत्यारोप करूनही धनंजय मुंडे यांचा विजय झाला. विशेष म्हणजे या ठिकाणी पंकजा यांच्या विजयासाठी भाजपाने प्रतिष्ठा पणाला लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी सभा घेतल्या होत्या. एकेकाळी पंकजा मुंडे यांच्या जवळचे समजले जाणारे व विदद्यमान सरकारमध्ये मंत्री असलेले प्रा. राम शिंदे यांचा कर्जत जामखेडमधून पराभव झाला आहे. पवारांच्या तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधीत्व करणारे तरुण तडफदार रोहित पवार या ठिकाणी विजयी झाले आहेत. शिंदे यांना निवडून दिले, तर त्यांना पुन्हा मंत्रीपद देऊ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारादरम्यान दिले होते, मात्र मतदारांनी ते साफ फेटाळत, शिंदे यांचा पराभव केला.जालन्यामधून दुग्धविकास राज्यमंत्री व शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांचा पराभव झाला आहे. कॉँग्रेसचे कैलास गोरंटयाल हे विजयी झाले आहेत. लोकसभा निवडणुकीला विदद्यमान केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याविरोधात लढण्याची भाषा करून त्यांना व भाजपाला खोतकर यांनी अडचणीत आणले होते. त्याचाच हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे.याशिवाय पुरंदरमध्ये शिवसेनेचे विदयमान मंत्री विजय शिवतारे यांचा कॉँग्रेसचे संजय जगताप यांचा विजय झाला आहे, तर शेवटच्या टप्प्यात मंत्री झालेले भाजपाचे संजय (बाळा) भेगडे यांना राष्ट्रवादीचे सुनील शेळके यांनी मावळमधून पराभूत केले आहे. भाजपात आलेल्या हर्षवर्धन पाटील (काँग्रेस), गोपालदास अग्रवाल (काँग्रेस), वैभव पिचड (राष्ट्रवादी),गोपिचंद पडळकर (वंचित बहुजन आघाडी), धैर्यशील कदम (काँग्रेस), रमेश आडसकर, भरत गावित, उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी) या उमेदवारांचा पराभव झाला आहे. तर, जयदत्त क्षीरसागर (राष्ट्रवादी काँग्रेस), दिलीप सोपल (राष्ट्रवादी), भाऊसाहेब कांबळे (काँग्रेस), शेखर गोरे (राष्ट्रवादी), रश्मी बागल (राष्ट्रवादी), विजय पाटील, संजय कोकाटे, दिलीप माने (काँग्रेस), नागनाथ क्षीरसागर, निर्मला गावित (काँग्रेस), प्रदीप शर्मा या शिवसेनेत प्रवेश केलेल्या उमेदवारांचा पराभव झाला आहे.