विधानसभा निवडणुकीसाठी चार उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.
मुंबई, दि. २२ : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून राजकीय पक्षांकडून उमेदवार याद्या जाहीर केल्या जात आहेत. महाविकास आघाडीमध्ये अद्याप जागावाटपाची चर्चा सुरु असतानाच घटक पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाने त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. शेतकरी कामगार पक्षाकडून अलिबागमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी चार उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. एकीकडे महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसताना शेकापनं चार उमेदवार जाहीर करत आघाडी घेतली आहे. जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. जयंत पाटील यांनी पेण- सुधागड, उरण, पनवेल आणि अलिबाग या चार मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. शेकापचे अतुल म्हात्रे हे पेण सुधागड मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं. उरणमधून शेकापचे प्रीतम म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.पनवेल मधून माजी आमदार बाळाराम पाटील लढणार आहेत. तर, अलिबागमधून शेकापच्या महिला आघाडी प्रमुख आणि जयंत पाटील यांच्या स्नुशा चित्रलेखा पाटील यांनी उमेदवारी मिळाली आहे.