IMG-LOGO
महाराष्ट्र

उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस कायम; दिल्लीतल्या बैठकीत केंद्रीय नेतृत्वाचा निर्णय

Tuesday, Jun 18
IMG

राज्य भाजपमध्ये कोणतेही बदल केले जाणार नसल्याचे बैठकीनंतर गोयल यांनी सांगितले.

मुंबई, दि. १८ :  नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवाचं विश्लेषण करण्यासाठी काल (मंगळवारी) दिल्लीत महाराष्ट्र भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरही चर्चा होईल, असंही सांगितलं जात होतं. दरम्यान, या बैठकीत भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांचा राजीनाम्याचा प्रस्ताव अमान्य केल्याचं पुढे आलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री पदी कायम राहणार असल्याचे स्पष्ट झालं आहे.लोकसभा निवडणुकीत अपयश आले असले तरी राज्य भाजपमध्ये कोणतेही बदल केले जाणार नाहीत, असे पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने मंगळवारी स्पष्ट केले. त्यामुळे उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी करणारे देवेंद्र फडणवीस त्या पदावर कायम राहणार असल्याचे अधोरेखित झाले आहे. लोकसभेच्या वेळी झालेल्या चुका दुरुस्त करून विधानसभेला सामोरे जाण्याचा या बैठकीत निर्णय घेण्यात आला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत राज्यातील भाजप नेत्यांची बैठक नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात झाली. केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल, फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार आदी नेते यावेळी उपस्थित होते. राज्य भाजपमध्ये कोणतेही बदल केले जाणार नसल्याचे बैठकीनंतर गोयल यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर सरकारमधून बाहेर पडून पक्ष कार्यावर भर देण्याची इच्छा व्यक्त करणारे फडणवीस हेच आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत उपमुख्यमंत्रीपदी कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रदेशाध्यक्षपदी बावनकुळे हेच कायम राहतील. विधानसभेसाठी कोणती रणनीती आखायची याचा आढावा घेण्यात आला.

Share: